सरपंचाकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By Admin | Updated: September 21, 2014 23:57 IST2014-09-21T23:57:24+5:302014-09-21T23:57:24+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर करून देण्याचे आमिष देऊन चार शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या तालुक्यातील सुकळी येथील सरपंच व उपसरपंचाविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरपंचाकडून शेतकऱ्यांची फसवणूक
उपसरपंचावरही गुन्हा : सुकळी येथील सिंचन विहीर मंजुरीचे प्रकरण
आर्णी : रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर करून देण्याचे आमिष देऊन चार शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या तालुक्यातील सुकळी येथील सरपंच व उपसरपंचाविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सरपंच अनिता रोहिदास जाधव, उपसरपंच नारायण सवाई राठोड असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुरीसाठी ३१ डिसेंबर २०११ रोजी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली गावात सभा घेण्यात आली. त्यावेळी हरीसिंग राठोड, ताराबाई कुऱ्हाडे, बहिणाबाई राठोड, सुभाष राठोड यांच्या नावे विहिरीसाठी ठराव घेण्यात आला. त्यानंतर सरपंच व उपसरपंचाने या चौघांकडून प्रत्येकी ५ हजार ३०० रुपये घेतले असा आरोप आहे. प्रत्यक्षात मात्र तेव्हापासून विहीरच झाली नाही. याबाबत सरपंच आणि उपसरपंचांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्यांनी आर्णी पोलीस ठाणे गाठले.
हिरासिंग मेरसिंग जाधव रा.सुकळी यांनी फसवणूक झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्यावतीने रविवारी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सरपंच अनिता जाधव, उपसरपंच नारायण राठोड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कुणालाही अटक केली नव्हती. मात्र या घटनेने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून असे अनेक प्रकार तालुक्यात पुढे येण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)