बँकेच्या गलथानपणाचा शेतकऱ्यांना फटका
By Admin | Updated: June 17, 2016 02:49 IST2016-06-17T02:49:02+5:302016-06-17T02:49:02+5:30
उत्तरवाढोण्यातील सेंट्रल बँक व्यवस्थापनाच्या गलथानपणाचा फटका उत्तरवाढोणा येथील शेतकऱ्यांना बसत आहे.

बँकेच्या गलथानपणाचा शेतकऱ्यांना फटका
सोनखास : उत्तरवाढोण्यातील सेंट्रल बँक व्यवस्थापनाच्या गलथानपणाचा फटका उत्तरवाढोणा येथील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
उत्तरवाढोणा येथील ज्ञानेश्वर माणिकराव कुणगर यांनी २०१२ मध्ये उत्तरवाढोणा सेंट्रल बँकेकडून ४० हजार रुपये कर्ज उचलले आणि २०१३ मध्ये व्याजासह या कर्जाची परतफेड केली. त्याचवेळी बँकेने ९० हजार रुपये पीक कर्ज कुनगर यांना मंजूर केले. मात्र बँक व्यवस्थापकाने तुमच्यावर दोन पीक कर्जाची परतफेड करणे बाकी असून, विहिरीसाठी असलेले कर्जसुद्धा भरावयाचे असल्याचे सांगितले. वास्तविक विहिरीच्या कर्जाचा १० हजाराचा हप्तासुद्धा कुनगर यांनी भरला होता.
परंतु बँक व्यवस्थापकाने कर्ज भरल्याची नोंद न घेतल्यामुळे कुनगर या गरीब शेतकऱ्याला संकटात टाकले. वारंवार लक्षात आणून देखील बँकेच्या चुकीमुळे कुनगर यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत कुनगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. (वार्ताहर)