मुलांनी टाकून दिले तरी आईचे काळीज तुटते लेकरांसाठीच

By Admin | Updated: May 8, 2016 01:54 IST2016-05-08T01:54:57+5:302016-05-08T01:54:57+5:30

बाळ पोटात असते, तेव्हापासूनच मातृत्वाचा सोहळा सुरू होतो. गर्भार आईचे कौतुक होते. तिच्या आवडी-निवडी तंतोतंत जपल्या जातात.

Even when the children are extinguished, the mother's tiredness will be broken | मुलांनी टाकून दिले तरी आईचे काळीज तुटते लेकरांसाठीच

मुलांनी टाकून दिले तरी आईचे काळीज तुटते लेकरांसाठीच

यवतमाळ : बाळ पोटात असते, तेव्हापासूनच मातृत्वाचा सोहळा सुरू होतो. गर्भार आईचे कौतुक होते. तिच्या आवडी-निवडी तंतोतंत जपल्या जातात. अख्खे घर तिच्या भोवती गोळा होते. मग ठराविक वेळी ती एका गोंडस जीवाला हे जग दाखविते. अचानक कौतुकाचा तिच्यावरचा ‘फोकस’ बाळावर केंद्रित होतो. या बदललेल्या आकर्षणाचे आईलाही अप्रूपच असते म्हणा. पण पुढे तिच्या आईपणाचे संपलेले कौतुक कधीच का परत येत नाही? लेकराची काळजी वाहता-वाहता ती आईची आजी होते. पण लेकरू त्याच्या स्वतंत्र जगात इतके मश्गूल होते, की हे जग दाखविणाऱ्या आईलाच त्याच्या जगात जागा उरत नाही. तिला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जातो. यवतमाळच्या वृद्धाश्रमात मुलांपासून दुरावलेल्या अशा अनेक माता आहेत. रविवारी जगभर साजऱ्या होणाऱ्या ‘मातृत्व दिना’च्या निमित्ताने या अनाथ आर्इंची कहाणीही जाणून घेऊ या...

लेकरासोबतच एक आईदेखील जन्म घेत असते. आजवर केवळ स्त्री असलेली ती प्रसूत होताच आई बनते. हाच तिचा नवा जन्म असतो. पण आईपणाची भूमिका निभावताना ती स्वत:च अनाथ होत जाते. नवरा-मुलं आपापल्या जगात गुंतत जातात. त्यांचे जग फुलविण्यासाठी आई कष्ट उपसत राहते. शेवटी आयुष्याच उत्तरार्ध आल्यावर तिनेच सजविलेल्या घराला ती नकोशी होऊ लागते. तिला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जातो. स्वत:च्याच मुलांनी टाकून दिलेल्या या आईच अनाथ होतात. अशा अनाथ मातांना सांभाळणारा वृद्धाश्रम यवतमाळात आहे. त्याचे नावही मातृत्वाचा सन्मान करणारे, ‘मातोश्री वृद्धाश्रम’!
काय वाटत असेल वृद्धाश्रमातील या मातृत्वाला? प्रसूतीकळेपासून सुरू झालेला तिचा प्रवास असा अपमानित मरणकळेपर्यंत का येतो? याची उत्तरं सापडतात मातोश्री वृद्धाश्रमातील जख्ख म्हाताऱ्या आईच्या तोंडून..!
‘मुलगा काय अन् मुलगी काय,
मातोश्री वृद्धाश्रमाच्या दोन नंबरच्या खोलीत जाता क्षणी भिंतीवर लावलेला बाळाचा फोटो दिसतो. वृद्धांच्या खोलीत तान्हुल्याचा फोटो? जरा प्रश्न पडतोच. पण या खोलीत राहणाऱ्या वृद्ध शालिनीबाई सांगतात, ‘आम्ही इथे राहतो तरी नातवांची आठवण येतेच ना? माझ्या मुलीच्या डिलेव्हरीच्या वेळेस तिच्या खोलीत असा फोटो लावायला डॉक्टरने सांगितले होते. तिची डिलेव्हरी झाली. पण हा फोटो मी घेऊन आले. माझ्या खोलीत बरा वाटतो.’ जगापासून दूर वृद्धाश्रमात राहणाऱ्या या आईला आपल्या लेकीला नेहमी-नेहमी भेटता येत नसले, तरी नातीच्या आठवणीसाठी असा फोटो तिला लावावासा वाटला. यापेक्षा मातृत्व म्हणजे वेगळे काय? शालिनीबार्इंना तीन मुली आहेत. तिघींचेही विवाह झाले. त्या आता वृद्धाश्रमात दिवस कंठतात. पण मुलींनी आपल्यासाठी काही करावे, अशी त्यांची अपेक्षाच नाही. उलट मुलीविषयीचा अभिमानच त्या व्यक्त करतात. त्या म्हणतात, ‘मुलगा काय अन् मुलगी काय, आमच्यासाठी सारे सारखेच. मी मुलगा-मुलगी असा भेदच मानत नाही. माझ्या तिन्ही मुली आपापल्या घरी सुखी आहे. त्यापेक्षा आणखी कोणते सुख मला पाहिजे?’ शालिनीबार्इंचा हा प्रश्नच मातृत्त्व म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर आहे.
ऐन तारुण्यात मुले दगावली
मातोश्री वृद्धाश्रमातील सुमन नावाच्या आईचे दु:ख तर शब्दातीतच. तिला दोन मुले आणि दोन्ही ऐन तारुण्यात मरण पावले. दोन तरणेताठे मुलं गमावलेल्या या मातेच्या मनाचा तळ सहजासहजी लागत नाही. मुलांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षात त्यांचे पतीही दगावले. निराधार सुमनला शेवटी नातेवाईकांनी वृद्धाश्रमात आणून सोडले. मनातले दु:ख दडवण्यासाठी त्यांनी स्वत:ला कामात गुंतवून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मला पूर्वीपासूनच स्वयंपाकाची आवड आहे, असे सांगत त्या वृद्धाश्रमातील रोजच्या स्वयंपाकात हातभार लावतात. दोन महिला स्वयंपाकासाठी असतानाही सुमनबाई भाजी करतात. पोळ्या करतात. मुलांविषयी त्यांना विचारणे म्हणजे, जखमेवरची खपली काढण्यासारखेच होते. पण, जसा प्रश्न आला, तसे उत्तर देण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी आहे. म्हणूनच त्या म्हणाल्या, ‘पोरायची आठवण तं लय येते. पण उपेग का हाय? थे वापस तं येनेस नाई आता. पोरं असते तं आज माह्याबी चांगल्या सुना राह्यल्या असत्या...’ सुमनबाईचं गाव सावर. यवतमाळ माहेर. मुलं आणि पतीच्या निधनानंतर ती माहेरी आली. ‘पन भावसुना कोनाचं जमू देते का? काई दिवस राह्यली, मंग भाश्यायनं आणून घातलं इथीसा.’ बोलता-बोलता सुमनबाईचा स्वर कातर होत गेला. सुरकुत्यांनी व्यापलेला चेहरा थरथरू लागला. वृद्धाश्रमातील इतर मातांना आपली पोरं भेटायला येत नाही, याचे दु:ख आहे. पण सुमनबार्इंचे पोरं कधीच येणार नाही, त्याचे काय?
सरस्वतीबाई म्हणतात, ‘साऱ्यायच्या घरात सारखाच ताल’
मातृत्वाला पारखे होऊनही आपल्या मुलांची काळजी वाहणारे असेच एक उदाहरण म्हणजे सरस्वतीबाई. गेल्या १८ वर्षांपासून त्या मातोश्री वृद्धाश्रमात राहतात. त्यांच्या ४ मुलांपैकी दोघे दगावले आहेत. दोन यवतमाळात राहतात. दोन मुलं असूनही तुम्ही वृद्धाश्रमात का राहता, असे विचारताच सरस्वतीबाई म्हणाल्या, ‘साऱ्यायच्या घरात सारखाच ताल हाये. गरिबायचं उघडं पडते, श्रीमंतायचं झाकून रायते. आता कोनाले का म्हनता? नशिबात जे आलं ते पाहाचं. आता मी इथं सुखातच हावो. पन माहा जे काही हाये ते पोरंस करीन ना? शेवटी रक्ताले रक्त धावनंस कवातरी. शेवटी मले नेऊन टाकाचं काम तं त्याह्यलेच करा लागन.’ सरस्वतीबाईच्या बोलण्यातले शल्य जितके सहज जाणवणारे तितकेच अस्वस्थ करणारे आहे.
सरस्वतीबाईची मुलंही रोजमजुरी करूनच पोट भरतात. त्यांच्या पतीला ऐकायला येत नव्हते. परिवारात ते ‘बसत’ नव्हते. म्हणून दोघेही नवरा-बायको वृद्धाश्रमात आसरा शोधत आले आणि इथलेच झाले. आता कधी-कधी नातू सरस्वतीबार्इंना भेटायला येतात. सरस्वतीबाईदेखील कधी-कधी घरी जातात. मुलांविषयी बोलताना हुंदके दाबत सरस्वतीबाई चांगलं-चांगलंच सांगते. ‘माहे पोरं माह्याकडे लक्ष देतात. बिमार पडली तं दवाखान्यात नेतात. मांगं एकडाव मी पडली तवा आमच्या घरात हे रडारडी झाली होती. मंग? जीव दुकतेस नं साऱ्यायचा माह्यासाठी.’ परिवाराचे असे गुनगान करताना एक मनातले दु:ख सरस्वतीबार्इंनी बोलून दाखविलेच, ‘सुनेनं सासू-सासऱ्यायले मायबापावानीस पाह्यलं पाहिजे. नव्या पोरायनं मायबापासंग जरासी माणुसकीनं राहाव गड्या.’ सरस्वतीबाईचं हे निरीक्षण समाजातील पांढरपेशा कुटुंबांना अंतर्मुख करणारे आहे.
पोरायले त्यायच्या पोरायसाठी मेहनत करू द्या
उमाताई नावाच्या आईचे विचार थोर आहेत. मुलांबाबत त्यांचा अजिबात रोष नाही. त्या म्हणाल्या, ‘आपण का हावो? कचरा! आज ना उद्या आपण उडून जाणारच हावो. मंग पोरं कमावत हाये म्हणून का त्यायले मांगतस राहाचं? आपले बापजादे मरून गेले. आपनयी जाणारच हावो. पण पुढची पिढी? त्या लेकरायचं काय? त्यायच्यासाठी कोन कमवन? म्हणून आपण इथं येऊन राहाचं. पोरायले त्यायच्या पोरायसाठी मेहनत करू द्याची. उद्या आपल्या सुनेनही म्हनलं पाहिजे का, बुढी होती तवा मले काहीस तरास नोहोता. मूर्ती गेली तरी कीर्ती राहिली पाह्यजे!’ परिवाराची आठवण काढताना उमातार्इंनी पाळणाच म्हटला...
झोप झोप तान्ह्या बाळा
लागू दे रे तुझा डोळा
आजी हालविते पाळणा
बाबाच्या हाती पानाचा विडा
आईच्या हाती चटणीचा गोळा
बाळाच्या हाती अफूचा गोळा
झोप झोप तान्ह्या बाळा...
कधी-कधी उमाताईला ‘इच्छा’ पूर्ण करण्यासाठी घरी जावेसे वाटते. ही इच्छा म्हणजे मटण. वृद्धाश्रमात ते मिळत नाही. घरी जाते तेव्हा नातवात ती रमून जाते. तो लहान होता, तेव्हा म्हटलेली पाळणागीतं उमाताई आता वृद्धाश्रमातल्या एकांतात गुणगुणत असते.

Web Title: Even when the children are extinguished, the mother's tiredness will be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.