२० शेतकºयांच्या मृत्यूनंतरही भाजपा सरकार गंभीर नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:25 IST2017-10-07T23:25:46+5:302017-10-07T23:25:59+5:30
फवारणीतील कीटकनाशकाची विषबाधा होऊन २० शेतकरी मृत्युमुखी पडणे हे ओपन मर्डर आहे. त्यासाठी थेट सरकारवर गुन्हा दाखल केला जावा.

२० शेतकºयांच्या मृत्यूनंतरही भाजपा सरकार गंभीर नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फवारणीतील कीटकनाशकाची विषबाधा होऊन २० शेतकरी मृत्युमुखी पडणे हे ओपन मर्डर आहे. त्यासाठी थेट सरकारवर गुन्हा दाखल केला जावा. एवढ्या मोठ्या हत्याकांडानंतरही राज्यातील भाजपा सरकार दोषींवरील कारवाईबाबत गंभीर नाही, असा आरोप वैदर्भीय काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने केला आहे.
जिल्ह्यातील विषबाधेने झालेल्या २० शेतकºयांच्या मृत्यूची दखल घेऊन प्रदेश काँग्रेसने वैदर्भीय आमदारांचे एक शिष्टमंडळ शनिवारी यवतमाळात पाठविले. विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातील आमदारांच्या शिष्टमंडळात यशोमती ठाकूर, प्रा. वीरेंद्र जगताप, अमित झनक यांचा समावेश आहे. शनिवारी आमदारांच्या या चमूने सर्वप्रथम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. तेथे उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची वास्तपूस केली. तेथील औषधोपचार व इतर सोई-सुविधांबाबत वैद्यकीय अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील कळंब, घाटंजी तालुक्यातील टिटवी, मानोली व पांढरकवडा तालुक्यातील फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांच्या घरी भेट दिली.
या आमदारांनी सांगितले की, भाजपा सरकारची केवळ घोषणाबाजी सुरू आहे. सरकार गंभीर नाही. कर्जमाफी अद्याप दिली नाही. मात्र त्यासाठी आॅनलाईन अर्ज भरताना शेतकºयांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. मिशनच्या अध्यक्षांनी एका मृत शेतकºयाच्या पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन ‘सीएमओ’च्या हवाल्याने दिले होते. परंतु प्रत्यक्षात २० दिवस लोटूनही काहीच झाले नाही.
या आमदारांसोबत जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आदर म्हणून व त्रास होऊ नये म्हणून जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना या दौºयापासून दूर ठेवल्याचे एका आमदाराने सांगितले. मात्र काँग्रेसची यंग ब्रिगेड खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
शिवसेनेला सोबत येण्याचे आवाहन
काँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ रुग्णालयात पोहोचले असता महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे तेथे बैठक घेत होते. तेव्हा शिवसेनेची जागा आता तेथे नाही, सेनेने जनतेच्या भल्यासाठी काँग्रेस सोबत यावे, असे आवाहन आमदार यशोमती ठाकूर यांनी राठोड यांना उद्देशून केले.
२० शेतकºयांचा कीटकनाशक फवारणीतून झालेला मृत्यू म्हणजे खुले हत्याकांड आहे. या प्रकरणी सरकारवर खुनाचा गुन्हा नोंदविला जावा. दोषींवर एफआयआर दाखल व्हावे. या हत्याकांडावरुन काँग्रेस विधानसभा दणाणून सोडेल.
- यशोमती ठाकूर
आमदार, काँग्रेस
विषबाधा प्रकरणात प्रशासनाचा कुणावरही वचक नाही. औषध विक्रेत्यांना राजाश्रय आहे. त्याशिवाय हे घडू शकत नाही. हे प्रकरण विधानसभेत लावून धरु आणि तरीही कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे आंदोलन करू.
- विजय वडेट्टीवार
उपनेते काँग्रेस