सिंचन विहिरीने आयुष्यात आणली समृध्दी
By Admin | Updated: November 22, 2014 02:02 IST2014-11-22T02:02:29+5:302014-11-22T02:02:29+5:30
शासनाच्या एखाद्या योजनेतून एखाद्याचे जिवनमान कसे उंचाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून घाटंजी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी...

सिंचन विहिरीने आयुष्यात आणली समृध्दी
यवतमाळ : शासनाच्या एखाद्या योजनेतून एखाद्याचे जिवनमान कसे उंचाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून घाटंजी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी विजय परचाके यांच्याकडे पाहिले पाहिजे. जेमतेम १.२१ हेक्टर जमिनीतून त्यांनी आपल्या प्रगतीचा मार्ग शोधला असून योजनेतून उपलब्ध झालेल्या सिंचन विहिरीने त्यांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली आहे.
निसर्गाच्या पावसावर अवलंबून असलेल्या या शेतकऱ्याने सिंचन विहिरीच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक पिके घेऊन शासकीय योजनेतून एखादा शेतकरी कसा पुढे जाऊ शकतो, हे दाखवून दिले आहे.
विजय बापुराव परचाके यांच्याकडे दहेगाव (ता.घाटंजी) येथे १.२१ हेक्टर इतकी जमीन आहे. या जमिनीवर ओलिताची सोय नसल्याने त्यांना निसार्गाच्या पावसावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे एकापेक्षा जास्त पिके घेता येत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. दुर्गम व डोंगराळ परिस्थितीत हलक्या व मध्यम स्वरूपाच्या शेतीवर त्यांना आपले कुटुंब चालविणे अवघड होते. अशातच त्यांना आदिवासी उपयोजनेतून शेतकऱ्यांसाठी विहीर मंजूर होत असल्याचे समजले आणि त्यांनी घाटंजी पंचायत समितीकडे अर्ज करून विहीर मंजूर करून घेतली.
२००९-१० मध्ये त्यांना सिंचन विहीर मंजूर झाली आणि विहीरीचे बांधकाम झाले. विहीरीपुर्वी त्यांना कपाशीचे एकरी उत्पादन तीन ते चार क्विंटल तर ज्वारीचे दोन ते तीन क्विंटल उत्पादन होत होते. विहीरीद्वारे सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने पहिल्याच वर्षी त्यांनी भाडयाने इंजीन घेऊन त्याद्वारे ओलित करून कपाशीचे एकरी १२ क्विंटल तर तुर व ज्वारीचे एकरी सहा क्विंटल याप्रमाणे उत्पादन घेतले. खरीप हंगाम २०१२-१३ मध्ये त्यांना केंद्रपुरस्कृत अभियांत्रिकीकरण योजनेंतर्गत पाच एचपीची पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार तसेच अनुदानावर ३५ एचडीपीइ पाईप देण्यात आले. या लाभामुळे शेतकऱ्याची शेतीबद्दलची दिशाच बदलली आणि पहिल्यांदाच त्यांनी प्री-मान्सुन कपाशीची लागवड करून त्यास तुषार सिंचनाद्वारे ओलित केले. त्यामुळे कपाशिचे एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळाले.
त्यात स्वत:हाचे एक हेक्टर व कुटुंबातील दोन हेक्टर शेतीमधून ९० क्विंटल कपाशीचा समावेश आहे. सन २०१२-१३ च्या हंगामातच ०.२० हेक्टर क्षेत्रावर चार क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळाले. गेल्या खरीप हंगामात ओलीताची सोय झाल्यामुळे १.२० हेक्टर क्षेत्रावर १५ क्विंटल सोयाबीनचे तर रब्बीमध्ये ८ क्विंटल पीक झाले. याशिवाय त्यांनी गेल्या हंगामापासून वांगी, चवळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केल्याने घाटंजी येथील बाजारात या भाजीपाला विक्रीचे त्यांना दर दिवशी ५०० ते १००० रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. त्यांनी शासकीय योजनेतुन साधलेल्या प्रगतीचे कौतुक करण्यासाठी घाटंजी न्यायालयाचे न्यायाधीश तेजवंतीसिंग संधु यांच्यासह विविध अधिका?्यांनी शेताला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आदिवासी उपयोजनेतील सिंचन योजनेमुळे खऱ्या अथार्ने आपल्या कुटुंबास स्थैर्य मिळाले असून पुढील हंगामात फळबाग लावण्याचा निर्धार शेतकरी विजय परचाके यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)