एसपी ‘चेंज’च्या चर्चेला अखेर विराम
By Admin | Updated: June 9, 2016 02:05 IST2016-06-09T02:05:30+5:302016-06-09T02:05:30+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला.

एसपी ‘चेंज’च्या चर्चेला अखेर विराम
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यात सिंह यांचे नाव नसल्याने त्यांच्या निकटवर्तीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर त्यांची बदली होणारच अशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
अखिलेशकुमार सिंह सुमारे वर्षभरापूर्वी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. सुरुवातीला त्यांनी स्वत: मटका-जुगार अड्ड्यांवर जाऊन धाड मारण्यापर्यंतची धडक कामगिरी केली. परंतु नंतर या कामगिरीत शिथिलता आली. त्यातच तत्कालीन घाटंजी ठाणेदाराचे प्रकरण गाजले. त्यामुळे सत्ताधारी नेते मंडळीची नाराजी झाल्याचे सांगत एसपींच्या बदलीच्या चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाल्या होत्या.
पहिल्या यादीत नाव नव्हते त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव असणारच असे बोलले जात होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांच्या समक्ष पोलीस बंदोबस्ताची दाणादाण उडाल्याने आणि सीएम नाराज झाल्याने आता बदली होणारच असे मानले जात होते. परंतु बुधवारी जारी झालेल्या यादीने एसपींच्या बदलीबाबत छातीठोकपणे सांगणाऱ्यांचा फुगा फोडला. त्यामुळे अखिलेशकुमार सिंह हेच किमान पुढील वर्षभर जिल्हा पोलीस दलाची धुरा सांभाळणार हे स्पष्ट आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
महानिरीक्षकांच्या बदलीकडे नजरा
४अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांची पुणे अथवा मुंबईत बदली निश्चित मानली जात आहे. त्यांच्या जागेवर कोण येणार याची चर्चा आहे. सध्या तरी सीआयडीच्या पुणे मुख्यालयातील अजित पाटील व विठ्ठल जाधव या अधिकाऱ्यांची नावे टॉपवर आहेत. मात्र पाटील यांना महानिरीक्षकपदी बढती मिळाली तरच अमरावतीत संधी मिळू शकते.