प्रवासी निवाऱ्यांना अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Updated: September 9, 2014 23:59 IST2014-09-09T23:59:54+5:302014-09-09T23:59:54+5:30
लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी

प्रवासी निवाऱ्यांना अतिक्रमणाचा विळखा
यवतमाळ : लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांना आॅईल लावून ठेवले जाते. जेणे करून त्यावर कुणीही बसणार नाही. ही बाब वारंवार संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडूनही कुठलीही कारवाई केली जात नाही.
निवाऱ्याच्या अगदी बाजूला विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी आपली दुकानदारी थाटली आहे. निरूपयोगी वस्तू या निवाऱ्याच्या अगदी बाजूला टाकून दिल्या जातात. त्याच्या दुर्गंधीमुळे निवाऱ्याजवळ थांबणाऱ्या नागरिकांचा जीव कासावीस होतो. त्यामुळे ते सुस्थितीत असलेल्या प्रवासी निवाऱ्याऐवजी भर पावसात बाहेर थांबून बसची प्रतीक्षा करतात.
अमरावती, दारव्हा मार्गावर धावणाऱ्या बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा उन्ह, पावसापासून बचाव व्हावा यासाठी दारव्हा नाक्यावर उत्कृष्ट दर्जाचे दोन प्रवासी निवारे उभारण्यात आले आहे. जवळपास नागरिक याचा उपयोगही घेतात. शिवाय, या मार्गावर असलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थीसुद्धा स्कूल बस आदी वाहनांची प्रतीक्षा या ठिकाणी बसून करतात. परंतु अलीकडे या निवाऱ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. या निवाऱ्याच्या मागील बाजूस काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. काहींनी तर निवाऱ्याच्या अगदी बाजूला आपला व्यवसाय थाटला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी होणारी गर्दी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विविध प्रकारचे शिल्लक राहिलेले खाद्य पदार्थ निवाऱ्याच्या अगदी बाजूला टाकले जाते. पावसामुळे कुजलेल्या या पदार्थाच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. ही बाब जागरूक नागरिकांनी संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिली. परंतु सुरुवातीपासूनच सहकार्याविषयी नकारात्मक भूमिका घेतलेल्या एसटी महामंडळाने ही बाबही फारशी गांभीर्याने घेतली नाही. प्रवासी निवारा नियमित स्वच्छ राहावा, यासाठी महामंडळाला पत्र देण्यात आले होते. मात्र त्यांनी हात वर केले. आता अतिक्रमणात सापडलेले प्रवासी निवारे मुक्त करावे, यासाठी नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्यालाही ठोकरण्यात आले. दारव्हा, नेर, अमरावती मार्गाने धावणाऱ्या बसद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. लांब पल्ल्याच्या जसे औरंगाबाद, पुणे, बीड, अकोला, परतवाडा, शेगाव, सोलापूर, शिर्डी आदी बसने प्रवास करणारे नागरिकही या प्रवासी निवाऱ्यात बसची प्रतीक्षा करत थांबतात. त्यांना अतिक्रमणधारकांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. संबंधितांनी गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)