अकरावी प्रवेशाची चिंता : क्षमता २५ हजार, उत्तीर्ण विद्यार्थी ३१ हजार
By Admin | Updated: June 18, 2014 00:26 IST2014-06-18T00:26:21+5:302014-06-18T00:26:21+5:30
दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थीसह पालकांना ११ वी प्रवेशाची चिंता लागली आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात २५ हजार ६५१ विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेतील एवढी क्षमता आहे.

अकरावी प्रवेशाची चिंता : क्षमता २५ हजार, उत्तीर्ण विद्यार्थी ३१ हजार
यवतमाळ : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थीसह पालकांना ११ वी प्रवेशाची चिंता लागली आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात २५ हजार ६५१ विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेतील एवढी क्षमता आहे. आता ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने हा ताळमेळ जुळविण्याची कसरत शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.
जिल्ह्यात ११ वीच्या सर्व शाखा मिळून ४६६ तुकड्या आहेत. या तुकड्यांमध्ये २५ हजार ६५१ विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. २०१३-१४ च्या शैक्षणिक सत्रातील ही आकडेवारी आहे. शिक्षण विभागाने यावर्षीसाठी अद्यापही नियोजन केलेले नाही. १८ जून रोजी अभ्यंकर महाविद्यालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील उच्च माध्यमिक, कनिष्ठ माध्यमिक, माध्यमिक विद्यालयांशी संलग्नीत प्राचार्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. येथे ११ वी प्रवेशाचा तिढा सोडविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या आदेशापर्यंत प्राचार्यांनी निश्चित केलेल्या कोट्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे आगाऊ सूचनाही देण्यात आली आहे. या बैठकीमध्ये ११ वीच्या तुकड्यातील विद्यार्थी संख्येत वाढ करून तोडगा काढला जातो की आणखी इतर उपाय केले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या शासनाकडून नवीन तुकड्यांचे नियोजन शिक्षण विभागाला आलेले नाही. जुन्याच पद्धतीने विद्यार्थी रचना राहणार आहे. उच्च माध्यमिक महाविद्यालयातील ११ वीच्या तुकडीमध्ये ६० विद्यार्थी ठेवण्याची मर्यादा आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयातील तुकडीमध्ये ८० विद्यार्थी आणि माध्यमिक विद्यालयाशी संलग्नीत असलेल्या तुकड्यांमध्ये एका वर्गात १०० विद्यार्थी ठेवण्याची मर्यादा आहे. आता यात फेरबदल केला जातो काय हेही महत्वाचे ठरणार आहे. मागील वर्षी असलेल्या क्षमतेपेक्षा पाच हजार ३८९ विद्यार्थी अतिरिक्त ठरत आहेत. जिल्ह्यात सध्या वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नीत ११ वीच्या १५ तुकड्या आहे. माध्यमिक शाळेत संलग्नीत ८०, स्वतंत्र महाविद्यालयात सात, जिल्हा परिषद शाळांशी संलग्नीत तीन, नगर परिषद शाळांशी संलग्नीत दोन, माजी शासकीय विद्यालयांशी संलग्नीत पाच, आदिवासी विकास आश्रमशाळांशी संलग्नीत १५ यानंतर कायम विनाअनुदानित तत्वावरच्या वरिष्ठ महाविद्यालयात दोन, खासगी माध्यमिक शाळेत ९५, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय ५० अशा ११ वीच्या तुकड्या आहेत. शिक्षण विभागाच्या नियोजनानंतरही चांगल्या महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ राहणार आहे.