मंत्री-आमदारांसाठी विद्युत ‘डीपी’ राखीव

By Admin | Updated: May 13, 2016 02:38 IST2016-05-13T02:38:06+5:302016-05-13T02:38:06+5:30

विद्युत डीपी जळाल्यानंतर वारंवार मागणी करूनही महिनोगणती ती बदलविली जात नाही. पर्यायाने शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत.

Electricity 'DP' for Ministers-MLAs | मंत्री-आमदारांसाठी विद्युत ‘डीपी’ राखीव

मंत्री-आमदारांसाठी विद्युत ‘डीपी’ राखीव

वीज महावितरणचा कारभार : शेकडो शेतकरी वाऱ्यावर, कृषिपंप बंद, पिके वाळली
यवतमाळ : विद्युत डीपी जळाल्यानंतर वारंवार मागणी करूनही महिनोगणती ती बदलविली जात नाही. पर्यायाने शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत. भूईमूग काढणाऱ्या मजुरांना पिण्यासाठीही पाणी नाही. एकीकडे शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे तर दुसरीकडे मंत्री-आमदार या राजकीय व्हीआयपींसाठी काही डीपी खास आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात किमान दोन हजार डीपींची मागणी आहे. मात्र त्या पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. जिल्ह्यात अनेक गाव-शिवारांमध्ये डीपी जळाल्या आहेत. तेथे नवीन डीपीची मागणी असली तरी गेल्या काही महिन्यांपासून ती प्रतीक्षेतच आहे. त्यासाठी प्रतीक्षा यादी दाखविली जात आहे. डीपीअभावी वीज पुरवठा खंडित झाला असून कृषीपंप बंद पडले आहे. पर्यायाने शेतकऱ्याची उन्हाळी पिके पाणी असूनही वाळली आहेत. आता अनेक शेतांमध्ये भूईमूग काढणीचे काम सुरू आहे. मात्र त्या मजुरांना पिण्यासाठीही पाणी नाही. डीपी उपलब्ध नसल्याचे वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी सर्रास सांगत आहे. वास्तव मात्र वेगळेच आहे.
वीज वितरण कंपनीला काही डीपी प्राप्त झाल्या. त्यासाठी शेतकरी अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत आहे. अर्ज, निवेदने, येरझारा करूनही त्यांना वाऱ्यावर सोडले गेले आहे. तर दुसरीकडे कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार यांचा फोन आल्यास तातडीने व्यवस्था करता यावी म्हणून काही डीपी खास आरक्षित करून ठेवल्या गेल्या आहेत. वीज वितरण कंपनीकडे आॅईलचीही टंचाई आहे. डीपीचे आॅईल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे देयक थकल्याने या कंपन्यांनी आॅईल पुरवठा बंद केला आहे. वितरण कंपनीकडे शिल्लक असलेले आॅईलसुद्धा व्हीआयपींचा कॉल आल्यास सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी डीपी आहे, परंतु आॅईल अभावी ती लावली जात नसल्याचे वीज यंत्रणेतूनच सांगितले जाते. डीपी नवीन लावणे तर दूर त्याची दुरुस्तीही तातडीने केली जात नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळते आहे. डीपी जळाल्याने गावातील वीज पुरवठाही बंद असल्याचे सांगितले जाते. महागाव तालुक्यातील अंबोडा या गाव व शेतशिवाराला जळालेल्या डीपीचा फटका बसतो आहे. एकट्या महागावात ७४ डीपींची मागणी नोंदविली गेली. मात्र अद्याप त्याचा पुरवठा झाला नाही. कनिष्ठ यंत्रणा विभागाकडे तर तेथील यंत्रणा यवतमाळच्या वितरण मुख्यालयाकडे बोट दाखवून वेळ मारुन नेत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Electricity 'DP' for Ministers-MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.