आठ नगरपरिषदेत जूनमध्ये खांदेपालट
By Admin | Updated: May 21, 2014 00:00 IST2014-05-21T00:00:01+5:302014-05-21T00:00:01+5:30
जिल्ह्यात आठ नगरपरिषदांमधील अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जुन रोजी संपुष्टात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी आतापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यवतमाळ, पुसद, वणी,

आठ नगरपरिषदेत जूनमध्ये खांदेपालट
यवतमाळ : जिल्ह्यात आठ नगरपरिषदांमधील अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जुन रोजी संपुष्टात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी आतापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यवतमाळ, पुसद, वणी, आर्णी, घाटंजी, दिग्रस, दारव्हा, उमरखेड येथील नगरध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्या पूर्वीच नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. नगर प्रशासन विभागाकडून अध्यक्ष निवडण्याचा कार्यक्रम जाहीर झाला नसली तरी कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी अपेक्षित संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी डावपेच आखले जात आहे. आठपैकी चार नगरपरिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित आहे. यापूर्वी वणी, उमरखेड, पुसद येथे महिला नगराध्यक्ष होत्या. नव्या आरक्षणातही वणी, उमरखेड, पुसद आणि घाटंजी येथे महिलांना अध्यक्ष म्हणूून आरक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८९ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी ४७, शिवसेना ४३, मनसे आठ, बसपा चार आणि अपक्ष १५ नगरसेवक आहेत. सध्या यवतमाळ मध्ये भाजप- राष्ट्रवादीत- बसपा सत्तेत आहे. पुसद येथे राष्ट्रवादी - शिवसेना, वणी येथे काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना-अपक्ष, घाटंजी येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पांढरकवडा, उमरखेड, आर्णी, दिग्रस येथे काँग्रेसचे पुर्ण बहुमत आहे. मात्र ज्या नगरपरिषदेत पूर्ण बहुमत नाही. तेथे नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी करणार्यांची संख्या अधिक आहे. अध्यक्षपदासाठी घोडेबाजार होणार असल्याने पक्षाच्या विरोधात जाऊनही नगरसेवकांची भूमिका राहण्याची शक्यता आहे. यवतमाळ मध्ये यापूर्वी अशी बंडखोरी झाली आहे. हीच बंडखोरी नव्याने होऊ घातलेल्या निवड प्रक्रियेतही कायम राहते काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)