कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यावर आठ दिवसांच्या लॉकडाऊनचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:00 AM2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात मंगळवारी कोरोना ब्लास्ट झाला असून आतापर्यंतची सर्वाधिक ५११ ही रुग्णसंख्या नोंदविली गेली. त्यामुळे ...

An eight-day lockdown on the district to prevent Corona | कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यावर आठ दिवसांच्या लॉकडाऊनचे सावट

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यावर आठ दिवसांच्या लॉकडाऊनचे सावट

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत : गुरुवारी टास्क फोर्सच्या बैठकीत होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात मंगळवारी कोरोना ब्लास्ट झाला असून आतापर्यंतची सर्वाधिक ५११ ही रुग्णसंख्या नोंदविली गेली. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सावधगिरी म्हणून पुढील आठ दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर केला जात आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत बुधवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात मंगळवारी सर्वाधिक ५११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यातील १७५ रुग्ण यवतमाळ तर १६५ पुसदमधील आहेत. सावधगिरी म्हणून आता कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणीची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी दरदिवशी दीड हजार तपासणीचे असलेले हे उद्दीष्ट आता वाढवून चार हजार केले गेले आहे. जिल्ह्यात सध्या १२० प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय पथकाचे डॉ. आशिष रंजन यांनी नुकतीच येथे भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रीय पथकानेही जिल्ह्यात किमान आठ दिवसाच्या लॉकडाऊनची शिफारस केली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी टास्क फोर्सची बैठक बोलविण्यात आली आहे. लाॅकडाऊन लावायचा का आणि लावल्यास त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याबाबतचा अहवाल संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याकडून मागितला जाणार आहे. त्यानंतरच लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे  जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेता लाॅकडाऊन गरजेचा वाटत असून नागरिकांनी काही दिवस कड सोसणे आवश्यक आहे. नागरिकांनी जागरुक राहून सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे सिंग यांनी सांगितले.  दररोज चार हजार नमुने तपासण्याचे आदेश दिले गेले. मंगळवारी २७०० नमुने तपासल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे सांगण्यात आले. 

दिग्रस, दारव्हासह चार तालुके ‘हॉटस्पॉट’
 सध्या दिग्रस, पुसद, दारव्हा व यवतमाळ हे चार तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. तेथील नगरपालिका क्षेत्रासोबतच लगतच्या ग्रामीण परिसरातूनही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांचा आकडा १५ हजार ८०० च्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या ४६७ झाली आहे. सद्यस्थितीत एक हजार ८०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना लसीकरणाला जाण्याची मुभा राहणार
 कडक लाॅकडाऊन लावण्यात येत असला तरी या दरम्यान कोविड लसीकरणासाठी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. नागरिकांच्या हितासाठीच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांनी सांगितले. यवतमाळ शहरात नव्याने तीन कोविड केअर सेंटर उघडले जाणार आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे १५५ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

मृतक यवतमाळ व बाभूळगावातील : तब्बल २१५ जण कोरोनामुक्त 

मंगळवारी जिल्ह्यात तब्बल ५११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली हेाती. परंतु बुधवारी हा आकडा कालच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी आल्याने नागरिकांना काहीसा दिला मिळाला. बुधवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असून १५५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. 
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. गत २४ तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २१५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात दोन मृत्यूसह १५५ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. 
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मृतांमध्ये यवतमाळातील ७४ वर्षीय आणि बाभूळगाव तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या १५५ जणांमध्ये ९९  पुरुष आणि ५६ महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ व पुसदमधील प्रत्येकी ४५, बाभूळगाव १५, दिग्रस १४, आर्णी ९, पांढरकवडा ७, नेर ६, मारेगाव ४, दारव्हा ३, कळंब २, राळेगाव २, उमरखेड १, वणी १ व इतर १ रुग्णाचा समावेश आहे. बुधवारी एकूण ९४२ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १५५ जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर ७८७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १७४१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार २४१ झाली आहे. २४ तासात २१५ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ३१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 
सुरुवातीपासून आतापर्यंत १ लाख ६६ हजार ३८७ नमुने पाठविले असून यापैकी १ लाख ६५ हजार २८५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. अद्याप ११०२ अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत १ लाख ४७ हजार ४४ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

 

Web Title: An eight-day lockdown on the district to prevent Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.