शिकवणी वर्गांमुळे शैक्षणिक विषमतेची विषवल्ली
By Admin | Updated: June 2, 2015 00:17 IST2015-06-02T00:17:39+5:302015-06-02T00:17:39+5:30
एकीकडे सर्वांसाठी शिक्षण या धोरणातून शिक्षण क्षेत्रात शासन सुधारणेचा डंका पिटत असले तरी दुसरीकडे काही ..

शिकवणी वर्गांमुळे शैक्षणिक विषमतेची विषवल्ली
गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान : नियमांची होतेय पायमल्ली, शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई नाही
दिग्रस : एकीकडे सर्वांसाठी शिक्षण या धोरणातून शिक्षण क्षेत्रात शासन सुधारणेचा डंका पिटत असले तरी दुसरीकडे काही व्यावसायिक शिक्षकांनी झारीतील शुक्राचार्याची भूमिका घेतली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्गाचे दुकान थाटून अनेकांनी रग्गड पैसा कमवित आहे. यातून श्रीमंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या वाटा प्रशस्त होत असून दुसरीकडे महागड्या शिकवण्या लावण्याची कुवत नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांची प्रगती धोक्यात आली आहे. या नियमबाह्य शिकवणी वर्गांमुळे भविष्यात शैक्षणिक विषमतेची विषवल्ली निर्माण होण्याचा धोका आहे.
खासगी शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना शिकवणी वर्ग चालविण्यास बंदी आहे. त्यातूनच महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी अधिनियमामध्ये काही प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहे. महाविद्यालयीन शिक्षकांना नियमानुसार महाविद्यालय परिसरात किंवा विद्यालय परिसरात खासगी शिकवणीवर्ग घेण्यास कायदेशीर प्रतिबंध आहे. तसेच शिक्षक, अधिव्याख्याते व प्राध्यापकांना शिकवणीवर्ग चालविता येत नाही. मात्र दिग्रससारख्या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून महाविद्यालय परिसरातच अनेक शिकवणीवर्गांना जोर आला आहे.
शहरात शंभरहून अधिक ठिकाणी अनधिकृतपणे शिकवणीवर्ग घेतले जातात. यामध्ये काही प्रोफेशनल शिक्षक स्वत:च्या कुटुंबासाठी हा व्यवसाय करीत असतात. तर काही सेवानिवृत्त शिक्षकदेखील रग्गड पेन्शनसोबतच अधिक पैसा कमविण्यासाठी शिकवण्या घेतात. अशा लोकांकडून शिकवणीसाठी वारेमाप वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांवर लादले जाते. यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. वाटेल तसे पॅकेज उकळले जाते.
दुसरीकडे घटनात्मक तरतुदीनुसार शैक्षणिक विषमता वाढू नये, याची खबरदारी घेणे शासनाची नैतीक जबाबदारी असली तरी अशा शिकवणीवर्गासाठी आजपर्यंत कोणतीही काटेकोर नियमावली आली नाही. जे काही नियम सध्या अस्तित्वात आहे तेदेखील पायदळी तुडविले जात आहे.
भरमसाठ शिकवणी शुल्क घेणाऱ्या शिकवणीवर्गांकडे फिरकण्याची क्षमतादेखील गरीब विद्यार्थ्यांमध्ये नाही. शहरातील अनेक मुख्य रहिवासी वस्त्यांमध्ये शिकवणीवर्ग चालतात. याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांनाही होतो. विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. यामध्येच अनेकदा मुलींच्या छेडखानीचीही प्रकरणे घडतात. रात्री-बेरात्री शिकवणीवर्ग सुरू असतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मात्र हे शिकवणीचालक कोणतीही हमी घेत नाही. (शहर प्रतिनिधी)
शाळेत शिकविले जात नाही
शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांकडून गांभीर्यपूर्ण शिकविलेच जात नाही. नियमानुसार तासिका घेतल्या जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते. काही शिक्षक शाळेत अजिबात शिकवित नाही. परंतु आपल्या खासगी क्लासेसमध्ये मात्र चांगले शिकवितात. त्यामुळे विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात उपस्थित न राहता शिकवणीवरच जोर देतात. आपला पाल्य मागे पडू नये, अशी भीती पालकांना वाटत असल्यामुळे तेदेखील भरमसाठ पॅकेज भरून पाल्याला खासगी शिकवणीवर्गात पाठवितात. यामध्ये गरीब विद्यार्थी मात्र उपेक्षित राहतात.