आधी दोषारोपपत्र अन् नंतर ‘सीआयडी’ तपास
By Admin | Updated: April 6, 2016 02:28 IST2016-04-06T02:28:34+5:302016-04-06T02:28:34+5:30
दारव्हा येथील बहुचर्चित आशुतोष राठोड या युवकाच्या खुनाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविताच या विभागाला लगेच दोषारोपपत्र दाखल करावे लागले.

आधी दोषारोपपत्र अन् नंतर ‘सीआयडी’ तपास
आशुतोष राठोड खूनप्रकरण : आरोपी कारागृहात
यवतमाळ : दारव्हा येथील बहुचर्चित आशुतोष राठोड या युवकाच्या खुनाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविताच या विभागाला लगेच दोषारोपपत्र दाखल करावे लागले. कारण यातील दोनही आरोपी तीन महिन्यांपासून कारागृहात होते. त्यांचे कारागृहातील ९० दिवस पूर्ण होत असल्याने सीआयडीने तातडीने दोषारोपपत्र दाखल केले.
हे दोषारोपपत्र दाखल करताना सीआयडीने पुरवणी दोषारोपपत्राची तजवीज ठेवली आहे. आशुतोष राठोड या युवकाचा त्याच्या मित्रांनीच गळा आवळून खून केला होता. पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याचा मृतदेह पुलाखाली जाळण्यात आला होता. आशुतोषच्या वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्यासाठी खुनाची ही योजना आखण्यात आली होती. गोरसेनेने हे प्रकरण दारव्हा पोलिसांकडून काढून सीआयडीकडे देण्याची मागणी लावून धरली. त्यासाठी तालुका स्तरावर आंदोलनेही केली गेली. या खुनामागे आणखी कुणी तरी असावे, असा गोर सेनेचा संशय आहे. दरम्यान सीआयडीकडे हा तपास सोपविला गेला. परंतु त्याच वेळी न्यायालयीन कोठडीतील आरोपींची ९० दिवसांची मुदत पूर्ण होत असल्याने चार्जशिट दाखल करावी लागली. आधी चार्जशिट नंतर तपासाची वेळ सीआयडीवर आली. (जिल्हा प्रतिनिधी)