द्वारकाप्रसाद शर्मा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी
By Admin | Updated: April 13, 2015 00:51 IST2015-04-13T00:51:01+5:302015-04-13T00:51:01+5:30
माणसातील माणूसपण ओळखून त्यांच्याशी आपुलकीने वागणारे आणि सर्वांच्या सुख:दुखात धावून जाणारे उत्तुंग

द्वारकाप्रसाद शर्मा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी
संजय राठोड : अमृत महोत्सवी हृद्यसत्कार
यवतमाळ : माणसातील माणूसपण ओळखून त्यांच्याशी आपुलकीने वागणारे आणि सर्वांच्या सुख:दुखात धावून जाणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे द्वारकाप्रसाद शर्मा होय. त्यांनी अनेकांना संकटात मदत केली, लोकोपयोगी कार्यात स्वत:ला वाहून घेतले अशा या व्यक्तिमत्त्वाचा सत्कार म्हणजे माणुसकीचा गौरव होय, असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
येथील दर्डा मातोश्री सभागृहात द्वारकाप्रसाद शर्मा अमृत महोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी आयोजित अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. शरदचंद्र कळणावत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, नगराध्यक्ष सुभाष राय उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड म्हणाले, माणूस समोर असला की त्याच्याबद्दल नेहमीच चांगले बोलले जाते. परंतु पाठीमागे चांगले बोलले जाईल, याची खात्री नसते. मात्र द्वारकाप्रसाद शर्मा त्याला अपवाद आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या मागेही कार्याचा गौरवच करताना दिसला, हे मी अनुभवले आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे सहकारी म्हणून त्यांनी मोठे काम केले. आणखी त्यांच्या हातून मानवसेवा घडावी, असे पालकमंत्री राठोड म्हणाले. (शहर वार्ताहर)
अशी श्रीमंती बघितली नाही - विजय दर्डा
अनेक श्रीमंतांची गरिबी आपण पाहिली आहे. परंतु एखाद्या गरिबाला अशा पद्धतीने श्रीमंत होताना पाहिले नाही. द्वारकाप्रसाद शर्मा परिश्रम, निष्ठा, विश्वास आणि काम करण्याचे सातत्य यातून कर्मवीर आणि धर्मवीर झाले आहे. आपल्या साध्या राहणीमानातून त्यांनी सर्वांना जिंकले. ते जीवन जगण्याची कला शिकविणारे व्यक्तिमत्व असल्याने लोकांचे द्वारकाधीश झाले आहे, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले. गंगा सदैव वाहत असते आणि किनाऱ्यालाही पवित्र करते, असे व्यक्तिमत्व द्वारकाप्रसाद शर्मा यांचे आहे. मानवतेचे पुजारी असलेल्या शर्माजींना आपण सदैव काम करतानाच पाहिले. हा अमृत महोत्सवी सत्कार नाही तर तो महाउत्सव असे सांगत खासदार दर्डा म्हणाले. बाबूजींनी त्यांच्यातील गुण हेरले आणि तेही बाबूजींच्या विश्वासास पात्र ठरले. माझ्या स्वाक्षरीचेही तेच जन्मदाता असून दर्डा परिवाराच्या यशात शर्माजींचे मोठे योगदान आहे. त्यांची आम्ही शताब्दी साजरी करू, असे खासदार दर्डा यांनी सांगितले. द्वारकाप्रसाद शर्मा यांना कार्यक्रम स्थळी वाजत गाजत आणण्यात आले. हाच धागा पकडून खासदार विजय दर्डा म्हणाले, शर्माजींचे लग्न झाले तेव्हा असे वाजत गाजत आणले नसेल आणि एवढे वऱ्हाडीही नसतील. आज मात्र तुमच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी एवढी मंडळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.