वन्यप्राण्यांच्या त्रासाने कोवळ्या पिकांचे नुकसान
By Admin | Updated: July 25, 2015 02:47 IST2015-07-25T02:47:00+5:302015-07-25T02:47:00+5:30
तालुक्यात सध्या रानडुक्कर अणि रोह्यांच्या त्रासाने शेतकरी बेजार झाले आहेत. एकीकडे पावसाने उशिरा येऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

वन्यप्राण्यांच्या त्रासाने कोवळ्या पिकांचे नुकसान
वनविभागाचे दुर्लक्ष : रोही, रानडुकरांचा हैदोस
नेर : तालुक्यात सध्या रानडुक्कर अणि रोह्यांच्या त्रासाने शेतकरी बेजार झाले आहेत. एकीकडे पावसाने उशिरा येऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचवेळी वन्यप्राण्यांच्या वाढलेल्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
जंगली श्वापदांद्वारे शेतातील पिके फस्त करण्यात येत आहे. त्यामुळे कास्तकारांसमोर नवीनच संकट उभे राहिले आहे. यातच मोझर, मांगलादेवी, कोलुरा, उत्तरवाढोणा, सोनखास, बाणगाव या परिसरात नुकत्याच उगवलेल्या शेतपिकांच्या अंकुरांवर वन्यप्राण्यांनी डल्ला मारणे सुरू केले आहे. आधीच कोरड्या दुष्काळाशी दोन हात करीत असलेला शेतकरी वन्यप्राण्यांमुळे अधिकच मोठ्या संकटात सापडलेला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर असताना वन्यप्राणी पीक उद्ध्वस्त करीत आहे. त्यामुळे पुन्हा शेती कशी करावी, हे संकट शेतकऱ्याच्या डोक्यावर घोंघावत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाकडेही तक्रारी दाखल केल्या आहेत. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. वन्यप्राण्यांनी ज्या शेतात नुकसान केले आहे, त्या शेतांची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. जंगल श्वापदांचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच कुंपणाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणीही करण्यात आली आहे. परिसरातील शेतशिवारांमध्येही रोही आणि रानडुकरांनी हैदोस घातला असून सोयाबीन, कपाशी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवरातील शेतपिकांची मोक्कापाहणी करून शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)