पुसदमध्ये दुबार पेरणीचे सावट
By Admin | Updated: July 17, 2015 02:30 IST2015-07-17T02:30:14+5:302015-07-17T02:30:14+5:30
तालुक्यात जवळजवळ ९० टक्के पेरणी झाली असून गत २३ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पुसदमध्ये दुबार पेरणीचे सावट
शेतकरी चिंताग्रस्त : सोयाबीन, कपाशी, तूर उद्धवस्त
पुसद : तालुक्यात जवळजवळ ९० टक्के पेरणी झाली असून गत २३ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांश शेतातील पिके उन्हामुळे करपली असून दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवार घेऊन बी-बियाणे व खताची खरेदी केली होती. जून महिन्यात पेरणीलायक पाऊस पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीला सुरुवात केली. पाऊस नसल्यामुळे पेरणी उलटली आहे. तर निघालेली कोवळी पिके वन्यप्राणी फस्त करत आहेत. तर काहींची करपली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचे मोठे संकट कायम आहे. पिके पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. अवेळी येणारा पाऊस तसेच नैसर्गिक कारणांमुळे हतबल शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होत असल्याने खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
यावर्षी सरासरी पाऊस कमी पडल्याने तालुक्यात माळरानावर अद्यापही मुबलक हिरवा चारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पाऊस न पडल्यास पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शेतीच्या बांधावर ही चारा उगवला नाही. त्यामुळे पशुपालक चिंतेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लागवड झालेली पिके सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी पिके धोक्यात आहे. आता पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच असून पावसाच्या प्रतीक्षेत जीव टांगणीला लागला आहे.
अनेक शेतकरी आता शेतात जाण्यासही टाळत आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर शेतात नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. दुबार पेरणीची चिंता शेतकऱ्यांना लागली असून बियाण्यासाठी पैशाची तजवीज कशी करावी, या विवंचनेत तालुक्यातील शेतकरी दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पाऊस पडावा, यासाठी गावागावात धार्मिक कार्यक्रम, जलाभिषेक, सप्ताह, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थानावर दररोज भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहे. तसेच धोंडी काढूनही वरुणराजाला विनवनी केली जात आहे.