कोरडवाहू शेतीमुळे बळीराजा त्रस्त

By Admin | Updated: May 24, 2015 00:14 IST2015-05-24T00:14:16+5:302015-05-24T00:14:16+5:30

सुपीक जमीन व पांढऱ्या सोन्याचा परिसर म्हणून वणी तालुक्याची ख्याती आहे. तथापि तालुक्यात केवळ १७ टक्केच शेती ...

Due to dry farm farming, the victims are suffering | कोरडवाहू शेतीमुळे बळीराजा त्रस्त

कोरडवाहू शेतीमुळे बळीराजा त्रस्त

१७ टक्केच सिंचन : नापिकी, कर्ज, निसर्गाची अवकृपा सदैव कायमच
वणी : सुपीक जमीन व पांढऱ्या सोन्याचा परिसर म्हणून वणी तालुक्याची ख्याती आहे. तथापि तालुक्यात केवळ १७ टक्केच शेती ओलिताखाली असून उर्वरित ८३ टक्के शेती कोरडवाहू आहे. या कोरडवाहू शेतीमुळे आता बळीराजा त्रस्त झाला आहे.
तालुक्यात अव्वल दर्जाचा आणि लांब धाग्याचा कापूस पिकतो. तालुक्यातील जमीन अत्यंत सुपिक आहे. मात्र सिंचनाची सुविधा तोकडी आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपले हिरवे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य नाही. तालुक्यात तब्बल ८३ टक्के शेती कोरडवाहू आहे. त्यात केवळ एकच पीक घेतले जाते. ओलिताची सोय नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. त्यामुळे ८३ टक्के शेतकरी अद्याप निसर्गाच्या भरवशावरच अवलंबून आहेत. त्यांना कोरडवाहू शेती कसावी लागत आहे.
वणी तालुक्यात उद्योगांची वानवा आहे. येथील एमआयडीसी परिसर भकास पडला आहे. मोजकेच उद्योग तेथे सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील ९० टक्के जनतेची उपजिवीका शेतीवरच अवलंबून आहे़ त्यात गेल्या २५ वर्षांत तालुक्यात कोळसा खाणी आल्या. त्यांनी हजारो हेक्टर शेती संपादित केली. परिणामी शेती क्षेत्रातही घट होत आहे. प्रत्यक्षात निसर्गान्े वणी तालुक्याला मुक्तहस्ताने संपन्न केले आहे. तालुक्याला पाण्याचे वरदान लाभले आहे. वर्धा व पैनगंगा या दोन मोठ्या याच तालुक्यातून वाहतात. याशिवाय निर्गुडा व विदर्भा या दोन प्रमुख लहान नद्याही तालुक्यात आहेत.
तालुक्यात लहान-मोठेही नालेही अनेक आहेत. मात्र या मोठ्या नद्या, नाल्यांचे पाणी अद्याप शेतापर्यंत पोहोचलेच नाही. धरणे, बंधारे बांधण्यात आली नाहीत. परिणामी सर्व पाणी वाहून जात आहे. त्याचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना कवडीचाही लाभ मिळत नाही. त्यांना निसर्गाच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गही शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. एक वर्ष अतिव्ष्टी, तर दुसऱ्या वर्षी कोरडा दुष्काळ, असे दुष्टचक्र सुरू आहे.
तालुक्यात ६५ हजार ५६२ हेक्टर शेती क्षेत्र आहे़ त्यापैकी केवळ ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे़ उर्वरित तब्बल ५४ हजार हेक्टर शेती कोरडवाहू आहे. यात काही शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात बोअर व ट्युबवेल खोदले आहे. मात्र अनेकांना वेळेवर वीज जोडणी मिळत नाही. परिणामी शेतात पाणी असूनही त्यांना ओलीत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना वर्षातूक केवळ एकच पीक घेता येते. सिंचन सुविधा नसल्याने तालुक्यात दिवसेंदिवस उत्पन्नात घट होत आहे. दुसरीकडे खर्च मात्र वाढत आहे. बियाणे, खत, किटकनाशके खरेदी करताना शेतकरी भांबावून जात आहे. त्यामुळे त्यांचे अंदाजपत्रक कोलमडून पडत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

निर्गुडा नदीचे खोलीकरण, बंधारे बांधणार
आता निर्गुडा नदीचे खोलीकरण करून त्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यासाठी नवीन सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आदींनी त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तथापि यावर्षी आता उन्हाळा संपत आला आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे हे खोलीकरण पुढच्या वर्षांवर जाण्याचीच जादा शक्यता आहे. परिणामी बंधारेही यावर्षी पूर्णत्वास येणे अशक्य आहे. चार महिन्यांपूर्वीच त्या दृष्टीने सुरूवात करणे आवश्यक होते.

बंधारे बांधण्याची गरज
तालुक्यात काही वर्षांपूर्वी नदी व नाल्यांवर सहा कोल्हापुरी बंधारे बांधणात आले होते. त्यापैकी एकाही बंधाऱ्यात पाणी साठविले जात नाही़ परिणामी या बंधाऱ्यांवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे. या बंधाऱ्यांचे बरगे तर कधीच चोरीस गेले आहे. शासन या कोल्हापुरी बंधाऱ्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ते आता निरूपयोगी ठरले आहेत.

Web Title: Due to dry farm farming, the victims are suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.