शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ
By Admin | Updated: December 13, 2014 22:47 IST2014-12-13T22:47:55+5:302014-12-13T22:47:55+5:30
भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे.

शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ
यवतमाळ : भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. मागील ७२ तासात दुष्काळग्रस्त भागात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याला केवळ युती शासनाची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप विर्दभ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी शब्द फिरविला असून तिजोरी खाली असल्यामुळे ते शक्य नाही असे सुतोवाच केले आहे. यामुळे विश्वासघाताच्या धक्याने शेतकरी आत्महत्या होत आहे.
ज्या ११ शेतकऱ्यांनी मागील ७२ तासात आपली जीवनयात्रा संपविली त्यांची ओळख माध्यमांनी मोरेश्वर चौधरी रा. देहेली, सुरेश जाधव रा. साखरा, त्याताजी सोनुर्ले रा. नागरगाव, हंसराज भगत रा. घारफळ या यवतमाळ जिल्ह्यातील शेतऱ्यासोबतच कचरु तुपसुंदरे रा. रामपुर जिल्हा अमरावती ,नामदेव खंडारे रा. माथान, वामन राउत रा. चांडोले जिल्हा बुलडाणा, उमाशंकर काटकर रा. आजनी केशव चौधरी रा. बोरगाव नागपूर, पांडुरंग हिवसे रा. खराडी भंडारा, रेवनाथ भारसाकळे रा. नगरी गडचिरोली असून यावर्षी विदर्भात १ हजार ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मस्तवाल अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदतीला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला. शेतकरी आत्महत्या व समस्यांचा तोडगा सिंचन नसून मातीचा ओलावा असा जावईशोध अधिकाऱ्यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने शेतकऱ््यांना वाऱ्यावर सोडले आहे.
सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही. त्यामुळेच दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत असे किशोर तिवारी यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)