डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची वाताहत
By Admin | Updated: February 25, 2016 02:27 IST2016-02-25T02:27:34+5:302016-02-25T02:27:34+5:30
राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही.

डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची वाताहत
शिक्षकबंदी उठवा : विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारा
दिग्रस : राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही. मागील पाच वर्षांपासून शिक्षक भरतीच राज्यात झालेली नाही. भविष्यात होणार की नाही, असे शिक्षणमंत्र्यांनीच ठणकावून सांगितले असताना टीईटीच्या माध्यमातून शासन स्वत:ची झोळी तर भरण्याचे काम करीत नाही ना, असा सवाल सध्या डीएड व बीएडधारकांना पडला आहे आणि त्यामुळेच मागील दोन वर्षांपासून डीटीएड व बीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. म्हणूनच अनेक डीटीएड कॉलेजेस बंद पडली आहेत.
पूर्वी डीएड केले की हमखास नोकरी, असे जणू समीकरणच बनले होते. त्यामुळे डीएड विद्यालयांचाही भाव वधारला होता. अनेक पालक आपल्या पाल्याला बारावीनंतर डीएडकडे वळवायचे. पण नंतर मात्र परिस्थितीत आमूलाग्र बदल होत गेला. आता तर डीएड महाविद्यालय विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्याचे दिसत आहे. संस्थाचालकांना खिरापत म्हणून वाटलेले डीएड कॉलेज आणि त्यातून हजारोच्या संख्येने बाहेर पडलेल्या भावी शिक्षकांच्या संख्येवर कुठेतरी प्रतिबंध येणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आज यवतमाळ जिल्ह्यात हजारो तर राज्यात साडेचार लाखांच्या घरात डीटीएडधारक सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात भटकंती करीत आहे. दुसरीकडे मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि पालकांचा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल, त्यातून शासकीय, जिल्हा परिषद शाळांना लागलेली गळती, त्यातून निर्माण झालेले अतिरिक्त शिक्षक या सर्वांमध्ये भावी शिक्षकांची अक्षरश: कोंडी झाली आहे. अशातच शासनाच्या उदासीन धोरणामुळे टीईटीसारख्या परीक्षांच्या माध्यमातून भावी शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम सुरू आहे. सध्या नर्सरी व केजीच्या गर्दीत शासकीय शाळांचा जीव गुदमरत आहे. आजच्या युगात आपला पाल्य कुठेही कमी पडू नये, या काळजीत पालक आहेत. महत्त्वाचे म्हणजे संस्थाचालकांच्या मक्तेदारीला कुठेतरी वचक निर्माण करून शासकीय शाळांप्रती पालकांचा दृष्टिकोन बदलविण्याची गरज आहे. तेव्हा कुठेतरी भावी शिक्षकांना अच्छे दिन येण्याची प्रतीक्षा बाळगता येईल. तर राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व्हायचे असताना आणि भविष्यात शिक्षक भरतीची सध्यातरी शक्यता नसताना टीईटीसारख्या परीक्षा घेवून विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, सरकारने शिक्षक बंदी उठवावी आणि त्वरित शिक्षकांच्या जागा काढाव्या. डीएड, बीएड, पदवी व पदविकाधारकांना बेरोजगार भत्ताही देण्यात यावा व टीईटीसारख्या परीक्षा सध्या तरी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य कराव्या व त्यांचे ज्ञान शासनाने अद्यावत करावे, आदी मागण्या डीएड व बीएडधारक विद्यार्थी संघटनांनी केल्या असून या मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)