हुंडाबळी नव्हे अनैतिक संबंधातून खून

By Admin | Updated: July 14, 2015 01:47 IST2015-07-14T01:47:45+5:302015-07-14T01:47:45+5:30

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा मृत्यू हुंडाबळी नसून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात

Dowry Not Immoral Relationships Blood | हुंडाबळी नव्हे अनैतिक संबंधातून खून

हुंडाबळी नव्हे अनैतिक संबंधातून खून

पुसद : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा मृत्यू हुंडाबळी नसून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मोठ्या बहिणीचे दीरासोबत असलेले संबंध जाऊ असलेल्या सख्ख्या लहान बहिणीने बघितल्याने तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली.
अश्विनी प्रेम राठोड (२०) हिचा हुंड्यासाठी गळा आवळून खून केल्याची तक्रार पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात ७ जुलै रोजी देण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी पती प्रेम, सासरा सुदाम, सासू अनसूया व किसन राठोड यांच्याविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक वास्तव पुढे आले. पांढुर्णा येथील मधुकर जाधव यांना छाया व अश्विनी या दोन मुली आहे. छायाचे लग्न गावातीलच सुरेश राठोडसोबत तर अश्विनीचे लग्न सुरेशचा लहान भाऊ प्रेमसोबत रीतिरिवाजाप्रमाणे लावून देण्यात आले होते. सुखाचा संसार सुरू असताना अश्विनीचा पती प्रेम आणि अश्विनीची मोठी बहीण छाया यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. अशातच ७ जुलै रोजी दुपारी या दोघांना अश्विनीने नको त्या अवस्थेत बघितले.
आपले अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून छाया व प्रेम या दोघांनी अश्विनीचा गळा आवळून खून केला. मात्र त्यावेळी अश्विनीचे वडील मधुकर जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता.
अश्विनीचा पती प्रेम याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्याने ही खळबळजनक कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी अश्विनीची मोठी बहीण छाया सुरेश राठोड (२५) हिला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल कुरळकर अधिक तपास करीत आहे. (प्रतिनिधी )

Web Title: Dowry Not Immoral Relationships Blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.