पीक वाचविण्यास परवानगी नको
By Admin | Updated: October 5, 2015 02:32 IST2015-10-05T02:32:54+5:302015-10-05T02:32:54+5:30
वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे रानडुकर, रोही अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाच्या परवानगीची वाट पाहू नये, ...

पीक वाचविण्यास परवानगी नको
पालकमंत्री : शेतकऱ्यांनी करावा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, हिवरी येथे सिलिंडर वाटप
हिवरी : वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे रानडुकर, रोही अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाच्या परवानगीची वाट पाहू नये, त्यांनी स्वत:च काही पावले उचलावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच तो लागू होईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे ५१ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड उद्घाटक म्हणून बोलत होते. पालकमंत्र्यांसह खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार यांच्या हस्ते गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले.
उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, सहाय्यक वनसंरक्षक केशव वाबळे, तहसीलदार अनुप खांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय निवल यांनी गावकऱ्यांच्या समस्यांचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचून दाखविला. त्यामध्ये पूरसंरक्षक भिंतीसाठी भरीव निधीची मागणी करण्यात आली. नदीवरील मातीबांध सर्वेनुसार करण्याची मागणी, ग्रामपंचायतपासून नाका पार्डी रोडला जुळणाऱ्या रस्त्यावरील पूल व रस्त्याचे बांधकाम करणारे, ग्रामसचिवालयाचे १५ वर्षांपासून रखडलेले बांधकाम पूर्ण करणे, अतिक्रमण झालेली घरे विस्थापित करण्यासाठी गावठाणची जागा संपादित करणे, अनुसूचित जाती जमातीसाठी गॅस कनेक्शन देणे, वन्यप्राण्यांपासून शेतीपीक वाचविण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित कुंपण द्यावे आदी समस्यांचा पाढा विजय निवल यांनी मान्यवरांसमोर वाचला. समस्या तातडीने न सोडवण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वन विभागाने गॅस वाटपाचे उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे. हिवरी हा जंगलव्याप्त भाग असून येथील वनसंपदा जिल्ह्याचे वैभव आहे.घराघरात गॅस सिलिंडर मिळावे व वृक्षांची कत्तल थांबावी, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या भरपूर योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. आत्महत्या करण्यापासून त्यांनी परावृत्त व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी रातचांदणा येथील शेतकरी अरविंद भेंडे यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच सुवर्णा कुमरे, उपसरपंच नितीन गावंडे, ग्रामपंचायत सदस्य नीता मंडलवार, दीपाली ससनकार, सुनीता मडावी, बबन चेके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा शहारे व पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी प्रिया नागभिडकर, आशा स्वयंसेविका आदींनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ, हार देवून स्वागत केले. शेकडो ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना आपल्या समस्यांचे निवेदन दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. हटकर आपल्या संपूर्ण स्टाफसह उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण उईके, पंचायत समिती सदस्य नारायण राठोड, माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर उईके, माजी सरपंच तुकाराम शहारे, पोलीस पाटील दिगांबर शहारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष वाघाडे, विनोद गावंडे, अरुण वाकळे, ओमप्रकाश लोहिया, जंगल कामगारचे अध्यक्ष यू.डी. आगरे, शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तेलमोरे, उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या डेरे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद जाधव व आर.एम. भोसले यांनी केले. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी मानले. (वार्ताहर)
फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश
गॅस सिलिंडर वाटपाचा कार्यक्रम संपताच गावात जाणाऱ्या रस्त्यावर फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी नाका पार्डी येथील सरपंच चिमू तिवारी यांच्यासह शेकडो महिला ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वाटखेड, नाकापार्डी, भांबराजा आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण उईके, पंचायत समिती सदस्य नारायण राठोड उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी मान्य केली वृक्षतोड
हिवरी येथील गॅस वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात सर्रास वृक्षतोड असल्याचे म्हटले. गेल्या काही वर्षात जंगलतोडीने पर्यावरण धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठीच शासनाने वन विभागाच्या माध्यमातून अनेक बदल केले आहे. जनधन योजनेच्या पार्श्वभूमीवर जन वन धन ही योजना सुरू केली आहे. वन धन-जन धन विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून वनांचा शाश्वत विकास करून या केंद्रातून जीवनावश्यक वस्तूंची विक्री होणार आहे. वन विभागाने या विक्री केंद्राकडे नागरिक आकर्षित होतील, याचे नियोजन करावे.