मन, बुद्धीवर नियंत्रणानेच भगवंत दर्शन
By Admin | Updated: July 1, 2015 00:16 IST2015-07-01T00:16:56+5:302015-07-01T00:16:56+5:30
चंचल मनावर आणि अस्थिर बुद्धीवर नियंत्रणासाठी आंतरिक उन्नतीचा म्हणजेच प्रज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागेल.

मन, बुद्धीवर नियंत्रणानेच भगवंत दर्शन
सीताराम शास्त्री : माहेश्वरी महिला मंडळाचा ज्ञानयज्ञ
यवतमाळ : चंचल मनावर आणि अस्थिर बुद्धीवर नियंत्रणासाठी आंतरिक उन्नतीचा म्हणजेच प्रज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागेल. प्रज्ञानानेच मन प्रभूभक्तीत रमते. एकदा मन प्रभूभक्तीत रमले की नियंत्रण आपोआपच होते. ज्याचे मन, बुद्धीवर नियंत्रण, त्यांनाच भगवंताचे दर्शन घडते, असे प्रतिपादन प.पू. सीताराम महाराज यांनी केले.
माहेश्वरी महिला मंडळद्वारा येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात चतुर्थ समिधा अर्पण करताना ते बोलत होते. याप्रसंगी ग्रंथपूजन व भागवताचार्यांचे स्वागत राजकुमार राठी, शंकरलाल कोठारी, चंद्रकांत बागडी, रमेशचंद्र राठी यांनी केले. प्रसंगी प्रश्नमंजूषा स्पर्धेतील भाग्यवान विजेत्या नीता चांडक आणि विद्या मनियार यांना महाराजांच्या हस्ते गौरवभेट देण्यात आली. संचालनाची जबाबदारी मंगला भंडारी यांनी पार पाडली.
सीताराम शास्त्री पुढे म्हणाले, विचारांना वाकविण्याचे सामर्थ्य फक्त मनाजवळ आहे. अतिसामान्य माणसातसुद्धा प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वास निर्माण करणारे एक अग्रगण्य शक्तीकेंद्र म्हणजे मानवी मन. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, ‘इंद्रियाणां मनश्चास्मि’ अर्थात सर्व इंद्रियात मन मी आहे. ‘पण’ हा पण शब्द फार महत्त्वाचा आहे. मनाला दुसरी बाजूसुद्धा आहे. म्हटले तर मन शंकर, नाहीतर तेच भयंकर. मन हनुमान आहे, तर तेच मन चंचल मर्कटसुद्धा. मन देव आहे आणि दैत्यही. संतांनी मनाच्या दोन्ही बाजूचे धर्म ओळखले आणि मनाला भगवत् भक्तीत गुंतविण्याचा मार्ग सांगितला आहे.
या कथा भागात शास्त्रींनी भरताचे चरित्र, श्री संकर्षण देवाची कथा, अजामिल आख्यान, दक्ष कथा, दधीचा ऋषीच्या अस्थीपासून वज्र निर्मिती, नारद-युद्धिष्ठीर संवाद मांडला. कथेदरम्यान कृष्ण जन्म सोहळा, श्रीकृष्ण जन्माचा देखावा सादर केला. गणेश पनपालिया आणि रोशनी पनपालिया व त्यांचे बाळभूवन यांनी यशोदा-नंद व बालकृष्ण रूप साकार केले. आरतीचे यजमानपद डॉ. हरिश झंवर, किशोर जाजू, श्यामसुंदर काबरा, गोपाल बाहेती, संतोष चांडक, संदीप सोनी, अनिल राठी, प्रेम गट्टाणी, चंद्रप्रभाबाई पनपालिया, शांताबाई अटल यांनी स्वीकारले. (वार्ताहर)