जिल्ह्यात २४ तासात ५६ मिमी पाऊस
By Admin | Updated: June 12, 2017 01:59 IST2017-06-12T01:59:35+5:302017-06-12T01:59:35+5:30
जिल्ह्यात अद्याप मान्सून सक्रिय झाला नसला तरी मृगधारांनी धरत्रीला चिंब केले आहे.

जिल्ह्यात २४ तासात ५६ मिमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात अद्याप मान्सून सक्रिय झाला नसला तरी मृगधारांनी धरत्रीला चिंब केले आहे. जिल्ह्यात गत २४ तासात ५६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक दारव्हा तालुक्यात १०१ मिमी पाऊस कोसळला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनचे कोकण किणारपट्टीत आगमन झाले असून लवकरच विदर्भात मान्सून धडकणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यात गत चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मृगनक्षत्राच्या या पावसाने शेतकऱ्यांची लगबग वाढली असून अनेक शेतात शेतकरी टोबणीच्या कामाला लागले आहे. यवतमाळ शहरात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणातील उकाडा कमी होऊन गारवा निर्माण झाला.
जिल्ह्यात दारव्हा तालुक्यात १०१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यवतमाळ ४.४० मिमी, बाभूळगाव ४१ मिमी, कळंब ८ मिमी, आर्णी ४२ मिमी, दिग्रस २८ मिमी, नेर २५ मिमी, पुसद ८० मिमी, उमरखेड ८० मिमी, महागाव ६० मिमी, केळापूर ५८ मिमी, घाटंजी ५१ मिमी, राळेगाव १४ मिमी, मारेगाव ६७ मिमी तर झरीमध्ये ९७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात पावसाने आशादायी चित्र निर्माण झाले आहे.