कर्मचाऱ्यांच्या विरोधात लोहीचे ग्रामस्थ धडकले जिल्हा कचेरीवर
By Admin | Updated: August 8, 2015 02:37 IST2015-08-08T02:37:18+5:302015-08-08T02:37:18+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. त्याखेरीज वेतन अदा न करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

कर्मचाऱ्यांच्या विरोधात लोहीचे ग्रामस्थ धडकले जिल्हा कचेरीवर
यवतमाळ : शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. त्याखेरीज वेतन अदा न करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानंतरही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. यालाच कंटाळून शुक्रवारी दारव्हा तालुक्यातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
दारव्हा तालुक्यातील लोही गावच्या नागरिकांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी न राहण्याच्या विषयासंदर्भात निवेदन सादर केले. यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, पोस्टमन यांसह इतरही कर्मचाऱ्यांया समावेश आहे. कर्मचारी मुख्यालयी न राहल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी शहर गाठावे लागते. रुग्णालयात डॉक्टर नसल्याने शहराच्या ठिकाणी रुग्णांना हलवावे लागते, यामध्ये जिल्हा प्रशासनाने स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदन देताना पंढरीनाथ सिंहे, गुलाब वानखडे, भीमराव जरे, अंबादास इंगोले, रमेश महल्ले, दीपक इंगळे, संजय शिंदे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)