जिल्हा बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या काढल्या
By Admin | Updated: May 29, 2015 00:13 IST2015-05-29T00:13:08+5:302015-05-29T00:13:08+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या सर्वच शाखांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची टॉपची २५ नावे असलेली यादी ठळक अक्षरात लवली होती.

जिल्हा बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या काढल्या
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या सर्वच शाखांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची टॉपची २५ नावे असलेली यादी ठळक अक्षरात लवली होती. हा प्रकार शेतकऱ्यांची मानहानी करणारा आहे. ही बाब ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उजागर केल्यानंतर बँक प्रशासनाला जाग आली. त्यांनी सर्व शाखा व्यवस्थापकांना या याद्या काढण्याचे आदेश दिले आहे.
संकटावर मात करून शेत पिकविणाऱ्या शेतकऱ्याला कर्जबाजारी ठरविण्याचे काम बँकेकडून केले जात होते. बँकेने दिलेल्या कर्जाचा परतावा न करू शकलेल्या शेतकऱ्याला समाजातूनच उठविण्याचा हा घाणेरडा प्रकार अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सुरू होता.
‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ निर्माण झाली. थेट सहकार उपनिबंधकाकडूनच या प्रकाराबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा बँक प्रशासनाने नमते घेऊन अखेर कर्जबाजारी शेतकऱ्यांची सामाजिक मानहानी थांबविण्याच्या दृष्टीने बँकेतील याद्या काढण्याचे आदेश दिले. मात्र बँकेने केलेल्या या कृती विषयी शेतकऱ्यांमध्ये रोष कायम आहे. (कार्यालय प्रतिनिधी)