वादळाचा वितरणला अडीच कोटींचा फटका
By Admin | Updated: May 9, 2016 02:22 IST2016-05-09T02:22:37+5:302016-05-09T02:22:37+5:30
जिल्ह्यात सलग तीन दिवस घोंगावणाऱ्या वादळाचा शेकडो घरांसोबतच वीज वितरणलाही मोठा फटका बसला.

वादळाचा वितरणला अडीच कोटींचा फटका
११९६ खांब आडवे : ८५ किलोमीटर वीज तारा तुटल्या
यवतमाळ : जिल्ह्यात सलग तीन दिवस घोंगावणाऱ्या वादळाचा शेकडो घरांसोबतच वीज वितरणलाही मोठा फटका बसला. वादळात वीज वितरण कंपनीचे ११९६ खांब आडवे झाले असून ठिकठिकाणी कोसळलेल्या वृक्षांमुळे तब्बल ८५ किलोमीटरच्या तारा तुटुन पडल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला असून त्याचा फटका पाणीपुरवठा योजना आणि कृषिपंपांना बसला. तसेच अनेक गावे आजही अंधारात आहे.
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून वादळी वातावरण आहे. या वादळाचा अनेक गावांना फटका बसला. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. तसेच फळबागांनाही त्याचा तडाखा बसला. यासोबतच वीज वितरण कंपनीच्या वीज तारा आणि खांबांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वीज वितरण कंपनीने व्यक्त केला आहे. गावागावांतील वीज तारा तुटल्याने अनेक गावे अंधारात आहे. यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद उपविभागातील गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. यासोबतच वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक गावातील नळ योजना प्रभावित झाल्या आहेत. कृषिपंपाचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
वादळामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले. हे वृक्ष वीज तारांवर पडल्याने तारा तुटल्या. तसेच खांब वाकले आहे. वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की लघुदाब वाहिनीसोबत उच्चदाब वाहिनीचे खांबही तुटून पडले आहे. सध्या वीज जोडणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वादळात यवतमाळ विभागात वीज वितरणचे १ कोटी ४ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले. उच्चदाब वाहिनीचे १२६ तर लघुदाब वाहिनीचे ४७३ खांब तुटून पडले. ४४ किलोमीटरची तार तुटली आहे. पांढरकवडा उपविभागात ३५ लाखांचे नुकसान झाले असून उच्चदाब वाहिनीचे ४४ आणि लघु दाब वाहिनीची ११५ खांब तुटले आहे. पुसद उपविभागात वीज वितरण कंपनीचे ९७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ३३ किलोमीटर तारा तुटल्या आहे.
लघुदाब वाहिनीचे ३४० तर उच्चदाब वाहिनीचे ९० खांब तुटले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अद्यापही काही गावे अंधारात आहे. (शहर वार्ताहर)