सोनखास परिसरात साथरोग
By Admin | Updated: September 25, 2014 23:35 IST2014-09-25T23:35:16+5:302014-09-25T23:35:16+5:30
नेर तालुक्यातील गावागावात सध्या साथरोगांचे थैमान माजले असून प्रत्येक घराघरात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आरोग्य विभाग मात्र यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

सोनखास परिसरात साथरोग
पांडूरंग भोयर - सोनखास
नेर तालुक्यातील गावागावात सध्या साथरोगांचे थैमान माजले असून प्रत्येक घराघरात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आरोग्य विभाग मात्र यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
नेर तालुक्यातील आरोग्य विभागातून रुग्णांना मिळणारी सेवा पाहता आरोग्य विभागच सलाईनवर असल्याचे दिसून येते. गावागावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते, याकडे सबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. शासकीय स्तरावरून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नाही. ग्रामिण जनतेमध्ये जनजागृती करण्याचे कामसुद्धा नियमितपणे होत नाही. वरिष्ठांचा कोणताही अंकुश शासकीय यंत्रणेवर दिसून येत नाही. या सर्व कारणांमुळे गावागावात साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये या आजारांची लागण लवकर होत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे.
डायरिया, मलेरिया, टायफाईड तेच डेंग्यूसदृश्य आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्वरित व योग्य सेवा अशा रुग्णांना मिळत नसल्याने त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक रुग्णांना शासकीय रुग्णालयातून क्षुल्लक कारणांसाठी यवतमाळला रेफर करण्यात येते. त्यामुळे गोरगरित रुग्णांना विनाकारण प्रवासभाड्याचा आर्थिक भूदंड व मानसिक त्रासही सहन करावा लागतो.
खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्यामुळे तुलनेने स्वस्त उपचार मिळणाऱ्या सावंगी मेघे व सेवाग्राम (वर्धा) येथे उपचारासाठी अनेक रुग्ण जात आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले असून ग्रामपंचायती मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावातील सांडपाण्याच्या नाल्या व गटारांची नियमित सफाई होत नाही. पाण्यांच्या स्त्रोतांची दुरूस्ती होत नाही, उघड्यावर शौछास बसण्याऱ्यांमध्ये कोणतीजी जनजागृती करण्यात येत नाही, आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात आजार बळावले आहेत.
ग्रामसेवकसुद्धा याबाबतीत कोणतीही काळजी घेताना दिसत नाही. गावातील लोकप्रतिनिधी सध्या गावातील कामे सोडून विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसतात. पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांचेसुद्धा याकडे दुर्लक्ष असल्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद आहे. शासकीय यंत्रणा केवळ नावापुरतीच शिल्लक आहे. ‘सांग पाटला काय करू ही प्रवृत्ती बळावत आहे. कोणीही आत्मियतेने कर्तव्य बजावण्यास तयार नाही.