कळंब, जोडमोहासह विविध गावच्या पाणीप्रश्नावर चर्चा

By Admin | Updated: April 2, 2016 02:54 IST2016-04-02T02:54:55+5:302016-04-02T02:54:55+5:30

येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला.

Discussion about the water stresses of various villages, including Kalamb, Jagnam | कळंब, जोडमोहासह विविध गावच्या पाणीप्रश्नावर चर्चा

कळंब, जोडमोहासह विविध गावच्या पाणीप्रश्नावर चर्चा

खासदारांची आढावा सभा : अधिकाऱ्यांना केल्या सूचना
कळंब : येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी पाणीटंचाई निवारणार्थ अनेक सूचना केल्या.
जोडमोहा येथील विहिरी येणाऱ्या काळात कोरड्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना खासदार गवळी यांनी यावेळी केली. अनेक वर्षांपासून बंद असलेली उमरी येथील पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली. हिरडी येथील पाणीपुरवठा योजना अपूर्ण असून लवकरच ती कार्यान्वित केली जाणार आहे. येथे विद्युत पुरवठा तत्काळ मिळाल्यास पाणीपुरवठा करणे सोपे होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसात विद्युत पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी विद्युत कंपनीचे उपअभियंता राऊत यांना दिले.
कळंब शहरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. त्यामुळे तलावाचे पाणी नदीला सोडण्यात आले. परंतु काही शेतकऱ्यांकडून नदीतील पाणी विद्युत मोटारी लावून शेतीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे बांधण्यात आलेले बंधारे कोरडे पडले आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर भावना गवळी यांनी तत्काळ मोटारी काढण्याच्या सूचना केली.
तिरझडाची नळयोजना सुस्थितीत आहे, अशी माहिती ग्रामसेवक हेडाऊ यांनी सभेत दिली. परंतु या गावातील एका नागरिकाने सभेत उभे राहून नळयोजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे सांगितले. अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कामठवाडा, मेटीखेडा येथेही पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगण्यात आले. यासोबतच सिंचन विहिरीचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देण्याची सूचनाही त्यांनी केली. यासोबतच इतर अनेक गावातील पाणीटंचाईचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य किरण पवार, तिलोत्तमा मडावी, विजय सुटे, कळंबचे नगराध्यक्ष दिगांबर मस्के, खविसचे उपाध्यक्ष सुदाम पवार, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, नगरसेवक राजेश मांडवकर, मारोती दिवे, नानाभाऊ धानफुले, मुख्याधिकारी एम.एस. व्यवहारे आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यू. व्ही. राऊत, जोडमोहाचे आरएफओ वानखडे, डॉ.मंगला उईके, विस्तार अधिकारी रमेश केळकर, पंकज बरडे, शाखा अभियंता अशोक कयापाक, विलास चावरे, मंडळ कृषी अधिकारी गुल्हाने, पशुधन विकास अधिकारी डॉ. मांडेकर, लागवड अधिकारी गवळी आदींचीही उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांची दांडी
कळंब तालुक्यात पाणीटंचाई ही अतिशय ज्वलंत समस्या आहे. अशा परिस्थितीत पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु सभापती वर्षा वासेकर, उपसभापती विजय गेडाम, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद मांडवकर या तिनही काँग्रेसच्या सदस्यांनी सभेकडे पाठ फिरविली. यासोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, दिवाकर ढोले, नीलिमा गोहणे या तिन जिल्हा परिषद सदस्यांनीही सभेला दांडी मारली. एकाच वेळी इतके सदस्य गैरहजर असणे हा अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: Discussion about the water stresses of various villages, including Kalamb, Jagnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.