शिक्षकांच्या आपसी बदल्यांवर पुन्हा चर्चा
By Admin | Updated: June 2, 2015 00:23 IST2015-06-02T00:23:35+5:302015-06-02T00:23:35+5:30
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आपसी बदल्यांवरून चांगलेच रणकंदन सुरू होते.

शिक्षकांच्या आपसी बदल्यांवर पुन्हा चर्चा
दीर्घ संघर्ष : सघटनांचे नियमावर बोट, सामान्य प्रशासन विभागातून दोनदा परतले फाईल
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आपसी बदल्यांवरून चांगलेच रणकंदन सुरू होते. शिक्षक संघटनांनी या बदल्या ‘प्रेस्टीज इश्यू’ केल्याने प्रशासनासोबत सातत्याने खटके उडत होते. २०११-२०१२ पासूनच्या बदल्यांची प्रक्रिया खोळंबली होती. अखेर संघटनांनी नियमावर बोट ठेवल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले.
शिक्षण विभागाच्या बदल्या ह्या सर्वांच्याच ‘इंटरेस्ट’चा विषय आहे. याकडे सर्वांचेच बारीक लक्ष असते. प्रशासनानेही नको तेवढा कायद्याचा किस या बदली प्रक्रियेसाठी पाडला. त्यामुळे सातत्याने संघर्ष सुरू होता. ग्रामविकास मंत्रालयाकडून आदेशानंतरही आपसी बदलीचे फाईल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून परत आले. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकाही घेतल्या. त्यानंतर सीईओंनी अशा संयुक्त बैठका घेतल्या.
आपसी बदलीवरून एकंदर अनेक बैठकांच्या फैरी झडल्या. त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. काही संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन ही प्रक्रियाच करता येणार नाही, अशी मागणी प्रशासनाकडे केली. त्यानंतर पुन्हा आपसी बदलीच्या निर्णयावर प्रशासनाने युटर्न घेतला.
शिक्षक संघटनानी पुन्हा दबाव तंत्राचा वापर करत आपले म्हणणे कसे बरोबर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्या तालुका पदाधिकाऱ्यांची थेट संघटनेतूच हकालपट्टी करण्यात आली. सोमवारी दिवसभर आपसी बदल्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी सीईओ आणि अध्यक्षांच्या कक्षापुढे ठिय्या देऊन होते. उशीरा पर्यंत आपसी बदल्यांबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालाच नाही. (कार्यालय प्रतिनिधी )