शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By Admin | Updated: September 7, 2014 00:11 IST2014-09-07T00:11:25+5:302014-09-07T00:11:25+5:30

आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी विमा प्रमाणपत्राअभावी (एलआयसी-आयडी) योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे न मिळाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या

Disadvantaged students from scholarship | शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

आम आदमी : अनेकांना अद्याप प्रमाणपत्रच मिळाले नाही
अण्णाभाऊ कचाटे - मारेगाव
आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी विमा प्रमाणपत्राअभावी (एलआयसी-आयडी) योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे न मिळाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून ते वंचित आहेत़
राज्यात शासनाने सन २००७ पासून ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आकस्मिक मृत्यू, अपंगत्व आल्यास गरीब कुटुंबांना काही आर्थिक लाभ, आधार व्हावा, म्हणून आम आदमी विमा योजना सुरू केली़ त्यावेळी ही योजना केवळ केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे केवळ ग्रामीण भूमिहीन शेतमजुरांपुरती मर्यादित होती़ महाराष्ट्र शासनाने सन २००८ मध्ये त्यात सुधारणा करून शेतमजुरांशिवाय एक हेक्टर बागायती व दोन हेक्टर कोरडवाहू भूधारकांना त्यात समाविष्ट केले़ याशिवाय सदर विमा प्रमाणपत्रधारकाच्या नववी ते बारावीत शिकणाऱ्या दोन अपत्यांना दरमहा १०० रूपये शिष्यवृत्ती लागू केली़ लाभार्थ्यांना या योजनेसाठी कोणताच विमा हप्ता भरावा लागत नाही़
शासन दरवर्षी या योजनेसाठी कोट्यवधी रुपये विमा कंपनीकडे हप्ता म्हणून भरते. असे असले तरी, या योजनेचा प्रचार व प्रसाराअभावी आणि विमा प्रमाणपत्रांअभावी शेकडो लाभार्थी वंचित आहेत. तसेच ते योजनेबाबत अनभिज्ञ आहे. प्रशासन मात्र सुस्त आहे़ तालुक्यात महसूल रेकॉर्डनुसार या योजनेचे सात हजार १४ लाभार्थी आहे. त्यातील पाच हजार ७१२ लाभार्थ्यांना (एलआयसी-आयडी) विमा प्रमाणपत्रे मिळाली आहेत. एक हजार ३०२ लाभार्थी अद्याप या प्रमाणपत्रांपासून अद्याप वंचितच आहे़
विमा प्रमाणपत्र व (एलआयसी-आयडी) क्रमांकाशिवाय लाभार्थ्यांना मृत्यू दावा, अपघाती दावा तसेच त्यांच्या पाल्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येत नाही़ तालुक्यात २० माध्यमिक व १० कनिष्ठ माध्यमिक महाविद्यालयात सन २०१४-१५ या वर्षात नववी ते बारावीमध्ये पटावर असणाऱ्या तीन हजार ४१५ विद्यार्थ्यांपैकी केवळ एक हजार ३९० विद्यार्थी आम आदमी शिष्यवृत्तीस पात्र आहेत़ त्यातील केवळ २९५ विद्यार्थ्यांकडे पालकांचे विमा प्रमाणपत्रे आहेत़ तेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करीत आहे. उर्वरित ५१९ विद्यार्थ्यांकडे विमा प्रमाणपत्रे नसल्याने ते योजनेच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
आम आदमी शिष्यवृत्तीपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विमा प्रमाणपत्र आहे, किंवा ज्यांनी इंटरनेटवरून विमा क्रमांक मिळविला, त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज शाळांकडून भरले जात आहे. तथापि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विमा प्रमाणपत्र नाहीत किंवा ज्यांच्याकडे विमा क्रमांक नाही, अशा विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांच्या वडिलांचा विमा लाभाचा अर्ज व शिष्यवृत्तीचा अर्ज भरून द्यावा़ त्यासाठी वर्ग शिक्षक, मुख्याध्यापकांनी तलाठ्यांच्या सहकार्याने वेळ देऊन विद्यार्थी पालकांचे अर्ज अपलोड करावे, सर्व अर्ज तपासून तलाठी व मुख्याध्यापक प्रमाणीत करतील व तहसील कार्यालय सेतू केंद्रात सादर करतील़ तहसीलदार हे सर्व अर्ज आॅनलाईन तपासतील व परिपूर्ण अर्ज महा ई-मेलने विमा कार्यालयास पाठवतील, अशा लाभार्थ्यांना विमा प्रमाणपत्र व विमा क्रमांक प्राप्त होऊन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरेणार आहे. मात्र ही प्रक्रिया जटील असल्याने व सर्वत्र आॅनलाईन सुविधा नसल्याने सदर योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रशासनाने या योजनेचे फलक व कारवाईची माहिती कार्यालयातील दर्शनी भागात नागरिकांच्या माहितीसाठी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांना योजनेची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.

Web Title: Disadvantaged students from scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.