तिवसा येथे डायरियाचा उद्रेक
By Admin | Updated: May 13, 2014 23:57 IST2014-05-13T23:57:44+5:302014-05-13T23:57:44+5:30
यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला आहे. जवळपास ५0 कुटुंबांमध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहेत. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये

तिवसा येथे डायरियाचा उद्रेक
४0 कुटुंबात लागण : दूषित पाणीपुरवठय़ाचा परिणाम सुरेंद्र राऊत - यवतमाळ यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला आहे. जवळपास ५0 कुटुंबांमध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहेत. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील दहा पैकी केवळ एका स्रोताचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. मात्र उपाययोजना करण्यात आल्या नाही. तिवसा या गावात तीन ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जातो. नळ योजनेच्या दोन विहिरी आहेत. त्यापैकी एक विहीर नदीच्या काठावर असून या परिसरात प्रचंड हागणदारी पसरली आहे. दुसरी विहीर खासगी शेतात असून हाच एक शुद्ध पाण्याचा स्रोत आहे. मात्र पाण्याच्या टाकीखाली प्रचंड घाण साचली आहे. येथे वितरिकेचे वॉल असून घाण पाणी यामध्ये शिरते. बोअरवेलवर मोटार बसवून काही घरांना पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र बोअरवेलचा परिसरही घाणीनेच बरबटलेला आहे. सार्वजनिक नळाच्या आजूबाजूला उकिरडे साचले आहे. याकडे ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे येथे दिसून येते. गावातील ४0 ते ५0 घरांना नळ योजनेचे पाणीच मिळत नाही. लगतच्या शेतातील विहिरीवरून पाणी भरावे लागते. या पाण्यामुळेच जीवन उद्धल पवार (१५), पुनम रमेश राठोड (१५), पियूष खटेश्वर मडावी (७), आकाश रोहिदास जाधव (५), तन्मय अरुण कुमरे (७), समीक्षा राजेश कुमरे (१0), वसंता कोडापे (४२), संतोष लक्ष्मण नैताम (२६), पांडुरंग तुकाराम घोडाम (६२), अभिजित गजानन चव्हाण (१८), सुरेश रामराव राठोड (२२), मंगेश आत्राम (२६), मिनाक्षी धवणे (१६), नीलेश चरण राठोड, प्रियंका रामराव राठोड, देवराव समक्या राठोड, छाया रामधन चव्हाण, विजय परसराम आडे आदींना जुलाब व अतिसाराचा त्रास सुरू झाला. काहींनी यवतमाळच्या खासगी रुग्णालयात तर काहींनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतला. यातील अनेक जण आजही रुग्णालयात भरती आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी कसरत सुरू आहे. महामार्गाच्या दुसर्या बाजूला असलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. वाहतूक सुरू असताना डोक्यावर गुंड घेऊन रस्ता ओलांडण्याची कसरत महिलांना करावी लागते. या भागात हातपंप असूनही केवळ किरकोळ दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कुणीच लक्ष देत नाही, असे वामन पेंदराम यांनी सांगितले. हातपंपाची ग्रामस्थांनीच वर्गणी करून दुरुस्ती करावी, असा सल्ला ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहे. शेतातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने ही लागण झाली आहे. या विहिरीत आजपर्यंत एकदाही ब्लिचिंग पावडर टाकले नाही. गावातील दहा पाणी स्रोतापैकी नऊ स्रोत जोखीम स्तरावर असल्याचा अहवाल ३0 एप्रिल रोजी ग्रामपंचायतीला दिला, असे येथील मलेरिया कर्मचारी आर.सी.ढबाले यांनी सांगितले. पिवळे कार्ड दिल्यानंतरही कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाही.बहुतांश पाण्याचे स्रोत घाणीने बरबटलेले दिसून आले.