मुकुटबन येथे महावितरणवर धडकला मोर्चा
By Admin | Updated: June 12, 2016 02:11 IST2016-06-12T02:11:01+5:302016-06-12T02:11:01+5:30
महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील जन युवा मंच व नागरिकांनी शनिवारी बसस्थानक परिसरातून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

मुकुटबन येथे महावितरणवर धडकला मोर्चा
अधिकाऱ्यांना निवेदन : युवा मंचने घेतला पुढाकार, गावपुढाऱ्यांनी दाखविली मोर्चांला पाठ
मुकुटबन : महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील जन युवा मंच व नागरिकांनी शनिवारी बसस्थानक परिसरातून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शनिवारी सकाळी येथील बसस्थानक चौकातून हा धडक मोर्चा निघाला. मोर्चेकरी वीज वितरण कार्यालयावर धडकले. त्यानंतर पांढरकवडा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन.जे.कटारे यांना १५ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी मोर्चकऱ्यांना मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मोर्चाचे नेतृत्व जन युवा मंचचे अध्यक्ष डॉ.मनोज बदोडेकर, सचिव संतोष कुरमेलवार, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर मद्देलवार यांनी केले. वीज वितरण कार्यालयावर डफडे वाजवत हा मोर्चा नेण्यात आला. गावातील एकही पुढारी विजेच्या संदर्भात पुढे न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी वन कार्यालयावर झालेल्या दगडफेकीमुळे काही ग्रामस्थांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचीच धास्ती घेऊन काही नागरिकांनी मोर्चात न जाणे पसंत केले. यावेळी पोलिसांनी वीज वितरण कार्यालयाला गराडा घातला होता. मात्र मोर्चेकऱ्यांनी शांतपणे कटारे यांना निवेदन दिले. यावेळी सहाय्यक अभियंता बी.एस.चव्हाण उपस्थित होते. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायब तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पडघन, पीएसआय अनिल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मारेगाव, वणी, पाटण, शिरपूर येथील पोलिसांचा अतिरिक्त ताफा बोलविण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)
मोर्चाने पुनरावृत्ती टाळली
तीन महिनयांपूर्वी वाघाला मारल्याच्या आरोपावरून बाप-लेकाला वन विभागाने ताब्यात घेतले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येथील वन कार्यालयावर दगडफेक केली होती. यात वाहनाच्या काचा फुटल्या होत्या. पोलिसांवरही दगडफेक झाली होती. नंतर याप्रकरणी कही ग्रामस्थांविरूद्ध गुन्हे दाखल झाले होते. त्या घटनेची दखल घऊन यावेळी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पूर्वीच्या मोर्चांची पुनरावृत्ती टळली. पोलिसांनी मात्र मागील घटनेचा धसका घेऊन चांगलाच बंदोबस्त ठेवला होता.