ढाबे, हॉटेलात गुन्हेगारांना आश्रय

By Admin | Updated: May 14, 2016 02:30 IST2016-05-14T02:30:11+5:302016-05-14T02:30:11+5:30

वर्धा जिल्ह्यातील वडनेरपासून तर पिंपळखुटीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७वर अनेक ढाबे व हॉटेल्स आहे.

Dhabe, shelter to the criminals at the hotel | ढाबे, हॉटेलात गुन्हेगारांना आश्रय

ढाबे, हॉटेलात गुन्हेगारांना आश्रय

राष्ट्रीय महामार्ग : ट्रक लुटीच्या दोन घटना घडूनही सर्वच विभाग उदासीन
प्रवीण पिन्नमवार पांढरकवडा
वर्धा जिल्ह्यातील वडनेरपासून तर पिंपळखुटीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७वर अनेक ढाबे व हॉटेल्स आहे. त्यापैकी काही अधिकृत, तर काही अनधिकृतपणे थाटण्यात आली आहे. हे ढाबे व हॉटेल बंद करण्याची वेळ पाळली जात नसून रात्री-अपरात्री सुरू राहतात. त्यामुळे गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा घडल्यानंतर काही गुन्हेगार तेथे आश्रय घेत असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील काही ढाबे व हॉटेलमध्ये परवानगीशिवाय दारू विक्री केली जात आहे. कोणत्याही हॉटेल व ढाब्यावर सुरू करण्याची व बंद करण्याच्या वेळेबाबत तसेच व इतर कारवाई होत नाही. त्यामुळे ते मुजोर झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर तसेच तालुक्यातील सर्वच मार्गावर ढाब्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. दिवसभर रिकामे दिसणारे ढाबे, हॉटेल्स रात्री फुल्ल दिसतात. रात्री ९ वाजतानंतरची गर्दी अनेक प्रश्नांना जन्म देणारी ठरत आहे.
पांढरकवडा शहर आणि तालुक्यातील काही लोकांची अशा ढाब्यांवर नेहमीच उठ-बस सुरू असते. रात्री तेथे त्यांचा ठिय्या असतो. या ढाब्यांवर अवैधरित्या दारूची विक्री करण्यासोबतच काही ठिकाणी जुगारही खेळला जातो. त्यातून काही लोकांमध्ये अनेकदा वादही उद्भवतात. ढाब्यांवर बसण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन पाळले जात नाही. जोपर्यंत ग्राहक उठत नाही, तोपर्यंत ढाबा चालकही ढाब्याच्या झडपा पाडत नाही. शहरालगत तसेच वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात रात्री १२ ते २ वाजतापर्यंत ढाबे व हॉटेल्स सुरू असतात. वास्तविक आधीच ही दुकानदारी बंद होणे गरजेचे आहे. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने ढाबा व हॉटेल्स चालकाचे चांगलेच फावत आहे.
जिल्हा ठिकाणची पथकेही कधी याप्रकरणी कारवाई करताना दिसत नाही. नुकतेच देवधरी घाटात ट्रक लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीने ट्रक चालकाचा निर्घृण खून केला होता. सदर ट्रक येण्यापूर्वी तो ट्रक येत आहे किंवा नाही, याची पाहणी करण्याकरिता सदर टोळक्याने रात्री दरम्यान एका हॉटेलचाच आधार घेतला होता, असे पोलीस तपासात पुढे येत आहे. तसेच नुकताच करंजीजवळील ट्रक दरोडा प्रकरणात लुटारूंनी नागपूरच्या दिशेने पळ काढला होता. ट्रकला थांबविण्यासाठी ट्रकच्या काचेवर दारूची बॉटल फेकून काच फोडला होता. या प्रकरणातही लुटारूंनी गुन्हा घडण्यापूर्वी हॉटेल्स किंवा ढाब्यावर आपल्या ठिय्या बसविला होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. एकूणच सतत घडणाऱ्या गुन्ह्यात ढाबे व हॉटेल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. वेळी-अवेळी ते सुरू राहात असल्याने गुन्हेगारांना तेथे आश्रय घेणे सोयीचे ठरते. पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Dhabe, shelter to the criminals at the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.