यवतमाळच्या विकासावरून नगरपरिषदेत सुंदोपसुंदी
By Admin | Updated: February 5, 2016 01:56 IST2016-02-05T01:56:41+5:302016-02-05T01:56:41+5:30
येथील नगरपरिषदेत भाजपा नगरसेवक कोट्यवधींच्या विकास निधीचा दावा करीत आहेत.

यवतमाळच्या विकासावरून नगरपरिषदेत सुंदोपसुंदी
सत्ताधारीच आंदोलक : भाजपा नगरसेवकाचा कोट्यवधींचा दावा
यवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपा नगरसेवक कोट्यवधींच्या विकास निधीचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे सत्तेतीलच बसपाच्या सभापतींनी मुलभूत सुविधेसाठी आंदोलन करतात. या सर्वांवर कहर म्हणजे कायम दोलायमान भूमिकेत असलेल्या माजी नगराध्यक्षाने पत्रपरिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. या घोषणाबाजीतून काय साध्य करायचे आहे, हा प्रश्न जनतेला पडला असून निवडणुका जवळ आल्याची ती नांदी ठरत आहे.
यवतमाळ शहरात सुरू असलेली विकास कामे कोणाच्या पाठपुराव्याने आलीत हे सर्वश्रृत आहे. यातील बहुतांश कामांमध्ये वाद उपस्थित होत आहे. आता विकास आराखड्याचे गाजर दाखवित अमृत शहर योजनेच्या नावाखाली घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. या योजनेतून शहरासाठी ५०० कोटी मिळतील, असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ५०० कोटींच्या २५ टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून भरावी लागणार आहे. इतकी आर्थिक सुबत्ता नगरपरिषदेजवळ नाही. एक मात्र गृह करातून मिळणारे उत्पन्न वगळता इतर सर्वस्रोत बंद पाडण्यात आले आहे. अशा स्थितीत लोकवर्गणीसाठीची रक्कम जुळविणे शक्यच नाही. तेव्हा निधी मिळणार कसा असा प्रश्न आहे.
विकास निधीची घोषणा करताना भाजपाचे स्थानिक आमदार, नगर परिषदेतील मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यापैकी एकही जबाबदार व्यक्ती पुढे आले नाही. भाजपाच्या तिसऱ्या फळीतील एका नगरसेवकाने याची घोषणा करावी, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या नगर परिषद उपाध्यक्षांनी ब्रसुद्धा काढला नाही.
भाजपासोबत सत्तेतील बसपानेसुद्धा मुलभूत सुविधांसाठी आंदोलन केले. महिला बालकल्याण सभापती ज्योती खोब्रागडे यांनी धरणे दिले. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकही आम्हीच असा संदेश त्यांनी दिला आहे. बसपाच्या चार सदस्यांच्या भरोश्यावरच येथील सत्तेचा डोल्हारा टिकून आहे. आठवड्याभरातच नगरपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी पत्रपरिषद घेऊन पालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. मात्र त्यांच्या पत्रपरिषदतेपूर्वी एक दिवस अगोदर झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी साधा जाबही विचारला नाही. सभागृहात एक अन् सभागृहाबाहेर दुसरी अशी दुटप्पी भूमिका दिसून आली. एकंदरीत नगर परिषदेतील विकास आणि त्यावरच्या वल्गना यातील दांभिकता सर्वांसाठीच क्लेषदायक ठरत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)