रेल्वेअभावी विकास थांबला
By Admin | Updated: July 26, 2015 02:26 IST2015-07-26T02:26:56+5:302015-07-26T02:26:56+5:30
कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातून उच्च प्रतीचा ...

रेल्वेअभावी विकास थांबला
रेल्वे मार्गाचे अवशेष शिल्लक : ७० वर्षांपासून शकुंतलेचे दर्शन नाही
संजय भगत महागाव
कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातून उच्च प्रतीचा कापूस थेट इंग्लडपर्यंत नेण्यासाठी इंग्रजांच्या काळात शकुंतला नावाची रेल्वे धावत होती. महागाव तालुक्यातील काळीपर्यंत शकुंतला धावत होती. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये या रेल्वेची गती थांबली ती कायमची. आजही या परिसरात रेल्वे मार्गाचे अवशेष आणि उद्ध्वस्त पूल दिसून येतात.
यवतमाळ ते मूर्तिजापूर धावणारी शकुंतला पूर्वी दारव्हावरून दिग्रसमार्ग विठाळा, काळी दौ., काटखेडा, चिचपाड, कासोळा, पुसद, वाशिम अशी पश्चिम मार्गावरून धावत होती. कासोळा, काळी दौ., हिवरी येथे रेल्वे स्टेशन होते. आजही याठिकाणी रेल्वे मार्गाचे अवशेष दिसून येतात. या परिसरातून रेल्वे धावत असल्याने कापूस निर्यातीचे मोठे केंद्र झाले होते. कापसाचे व्यापारी मोठ्या प्रमाणात या भागात येत होते.
परंतु काही काळानंतर हा रेल्वे मार्ग कायमचा बंद झाला. रुळही काढून नेण्यात आले. त्यामुळे या परिसराचा विकास खुंटला आहे. पुसदवरून रेल्वेने जावयाचे असल्यास थेट नांदेड, अकोला किंवा धामणगाव गाठावे लागते. त्यासाठी १०० किलोमीटरचे अंतर कापावे लागते. शेतमालाला योग्य बाजारपेठ देण्यासाठी शकुंतलेच्या जुन्या मार्गावर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उभारावा, अशी मागणी होत आहे. रेल्वेअभावी या परिसराचा विकास ठप्प झाला आहे.