उपजिल्हाधिकाऱ्यावरील ‘ट्रॅप’ने महसूल यंत्रणा ‘टाईट’
By Admin | Updated: September 3, 2014 23:44 IST2014-09-03T23:44:27+5:302014-09-03T23:44:27+5:30
उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी येथे पहिल्यांदाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकल्याने स्थानिक महसूल यंत्रणा पूर्ती हादरुन गेली आहे. एसीबीचा धसका घेत महसूल

उपजिल्हाधिकाऱ्यावरील ‘ट्रॅप’ने महसूल यंत्रणा ‘टाईट’
यवतमाळ : उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी येथे पहिल्यांदाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकल्याने स्थानिक महसूल यंत्रणा पूर्ती हादरुन गेली आहे. एसीबीचा धसका घेत महसूल यंत्रणेने चिरीमिरीची तमाम कामे सध्या बाजूला ठेवली आहे. त्यामुळे येथील बिल्डर लॉबीत काहीशी अस्वस्थता पहायला मिळत आहे.
नागपुरात आॅटो मोबाईल क्षेत्रातील नामांकित असलेल्या परिवारातील सदस्याला डिवचल्याने येथील उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भड यांना कोठडीत जावे लागले. शेतीशी संबंधित काम घेऊन आलेल्या त्या प्रतिष्ठीताने पाहिेजे तेवढे वर पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. केवळ एका दिवसात काम करा अशी त्यांची अट होती. मात्र भड यांनी तीन दिवस काम तर केलेच नाही उलट त्यांना दिवसभर ताटकळत ठेवले. वरून पैशांची मागणीही केली. म्हणून चिडलेल्या त्या उद्योजकाने थेट एसीबी गाठून भड यांच्यावरील ट्रॅप यशस्वी केला. या ट्रॅपने महसूल यंत्रणा जणू सुतासारखी सरळ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
एसीबीच्या ट्रॅपमुळे महसूल विभागातील कामे तूर्त तरी चिरीमिरीशिवाय होऊ लागली आहे. ज्या कामांमध्ये मोठी ‘मार्जीन’ आहे ती कामे तूर्त बाजूला ठेवली गेली आहे. त्या कामांवर कुणीही महसूल कर्मचारी बोलण्यास तयार नाही. काम करतही नाही आणि नाकारतही नाही, अशी स्थिती आहे. एसीबीच्या ट्रॅपची दहशत आणि चर्चा संपल्यानंतर या अडलेल्या फाईली मार्गी लावण्याचा महसूल यंत्रणेचा मनसुबा असू शकतो. यामुळे बिल्डर लॉबी मात्र अस्वस्थ आहे. आधीच बिल्डर लॉबी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांच्या कारभाराने त्रस्त होते. त्यांच्या बदलीच्या प्रतीक्षेत अनेक महिने या बिल्डरांनी आपली कामे बाजूला ठेवली. बदली झाल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्याचा प्रभार ज्ञानेश भट यांच्याकडे आला. नंतर तेथे पूर्णवेळ अधिकारीही रुजू झाले. मात्र भट जुन्या प्रकरणात अडकल्याने महसूल विभागातील कुणीही आता ‘रिस्क’ घेण्यास तयार नाही. त्यामुळे बिल्डरांसह इतरांची मार्जीनची कामे जणू थांबली आहे. महसूल खात्यात शुकशुकाट पहायला मिळत आहे. अवैध कामे, त्यासाठी लाच घेणे हे प्रकार काही काळासाठी का होईना बंद झाले आहे.
एसीबीच्या ट्रॅपनंतरची दहशत आणि सामान्यांची झटपट व सुरळीत होणारी कामे लक्षात घेता एसीबीने आपल्या ट्रॅपची संख्या आणि व्याप्ती वाढवावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. शासनाच्या मुजोर झालेल्या महसूल यंत्रणेला वठणीवर आणण्यासाठी एसीबीचे ट्रॅप उपयोगी पडत असल्याने नागरिकांचा एसीबीकडे जाण्याचा कल वाढला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यावर ट्रॅप झाला त्याच दिवशी सकाळी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातही एका सहायक फौजदाराला लाच प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे पोलीस दलातही सामसूम पहायला मिळत आहे. चिरीमिरीकडे खाकी वर्दी सध्या दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. (जिल्हा प्रतिनिधी)