ठेवीदार ‘भगवंत’ भरोसे
By Admin | Updated: August 7, 2015 02:19 IST2015-08-07T02:19:01+5:302015-08-07T02:19:01+5:30
येथील भगवंत पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. परंतु नेमके दोषी कोण आहे, हे अजूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निश्चित करता आले नाही.

ठेवीदार ‘भगवंत’ भरोसे
संचालकांमध्ये दोन गट : भगवंत पतसंस्थेचा घोटाळा
हरिओम बघेल आर्णी
येथील भगवंत पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. परंतु नेमके दोषी कोण आहे, हे अजूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निश्चित करता आले नाही. बँकेत किंवा संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आॅडिट सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जाते. हे आॅडिट येत्या १० आॅगस्टला संपणार आहे. त्यानंतरच दोषी कोण, हे समोर येईल असे सहायक निबंधक एम.आर. अंबिलपुरे यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी ठेवीदारांना कुणीही वाली उरलेला नाही.
या पतसंस्थेत ८० ते ८५ ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. त्या ठेवी दोन कोटी रुपयांच्या घरात आहेत. ठेवीदारांची मुदत संपून तीन ते चार वर्षे उलटली. परंतु ठेवी परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे बँकेचे संचालक व कर्मचारी हेच खऱ्या अर्थाने दोषी आहेत. त्यांची संपत्ती सील करून ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत देण्यात यावी, यासाठी ठेवीदार वारंवार वरिष्ठांकडे चकरा मारत आहेत. मात्र कुठेही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांनी आता २० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून संचालक व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संचालक व बँक कर्मचाऱ्यांनी मिळून नियम डावलून कसा घोटाळा केला, याविषयी निवेदनात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या निवेदनावर राजाभाऊ कोडाप्पा पद्मावार, रामदास येरावार यांच्यासह अनेक ठेवीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भगवंत बिगर शेती सहकारी पतसंस्था यामध्ये १३ संचालक आहेत. बँकेत कारभार व्यवस्थित सुरू नाही, नियमांना तिलांजली देवून स्वार्थ साधला जात असल्याचे काही संचालकांच्या लक्षात आले होते. त्यावेळी त्यांनी जबाबदार संचालकांना सावधानही केले होते. परंतु पदाधिकारी संचालक गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यावर यातील काही संचालकांनी आपल्यावर आरोप येवू नये, म्हणून राजीनामेही दिले होते.
या घटनेमुळे संचालक मंडळात सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. यातील काही संचालक निरपराध आहेत, असे ठेवीदारसुद्धा सांगत आहे. दोषी कोण आहे हे १० आॅगस्टनंतर सिद्ध होणार आहे.
प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द करा
पतसंस्थेत घोळ झाला म्हणून पुढील कामकाज पाहण्यासाठी संबंधित विभागाने प्राधिकृत अधिकारी म्हणून अनंता उत्तमराव नागरगोजे यांची नियुक्ती केली. परंतु या अधिकाऱ्यावर महागाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. नागरगोजे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागालाही फसविले आहे. याची माहिती तत्कालीन सहायक निबंधक बी.डी. राठोड यांना होती. कारण राठोड हे पुसद येथेही कार्यरत होते. असे असताना बी.डी. राठोड यांनी नागरगोजे यांची प्राधिकृत अधिकारी पदावर केलेली नियुक्ती चुकीची आहे. ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी बँकेचे सभासद सुहास येरावार, तुकाराम काळे, रमेश काळे, भास्कर ढबाले, महादेव टांगले यांनी सहकारमंत्र्यांसह जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.