काँग्रेसची ‘डीपीसी’बाहेर निदर्शने
By Admin | Updated: February 1, 2016 02:14 IST2016-02-01T02:14:06+5:302016-02-01T02:14:06+5:30
दुष्काळग्रस्त जिल्ह्याला केवळ पाच लाख रुपये मंजूर करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे होय.

काँग्रेसची ‘डीपीसी’बाहेर निदर्शने
पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी : नारेबाजीने पोलिसांची तारांबळ
यवतमाळ : दुष्काळग्रस्त जिल्ह्याला केवळ पाच लाख रुपये मंजूर करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाहेर जोरदार निदर्शने केली. अचानक आलेल्या या मोर्चाने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. पालकमंत्र्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी नारे लावत बैठकीत शिरण्याचा प्रयत्नही केला.
जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना पाच लाख वाटायचे कसे याचा हिशेब पालकमंत्री संजय राठोड यांनी द्यावा, बैठका घेण्याचे नाटक करू नये, असे म्हणत, काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभेकडे आले. पोलिसांचा बंदोबस्त असल्याने एक-दोनच्या संख्येने बचत भवन परिसरात गोळा झाले. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, यवतमाळ शहर अध्यक्ष चंदू चौधरी, प्रदीप डंभारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन मिर्झापुरे, शुभम लांडगे, दिनेश गोगरकर, अरुण ठाकूर, उमेश इंगळे, शबीर बेग, अरुण ठाकूर, कृष्णा पुसनाके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकून घ्याव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पोलीस कुमक येईपर्यंत त्यांना चर्चेतच गुंतवून ठेवले. शेवटी उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी आंदोलकांना पोलिसांच्या वाहनामध्ये डांबून स्थानबद्ध केले. सायंकाळी या आंदोलकांची सुटका करण्यात आली. मात्र अचानक आलेल्या धडक मोर्चामुळे नियोजन समितीची बैठक काही काळासाठी प्रभावित झाली. नंतर दार बंद करून सभा पूर्ववत घेण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)