सावरगड कचरा व्यवस्थापन प्रकल्प हटविण्याची मागणी
By Admin | Updated: August 12, 2014 00:11 IST2014-08-12T00:11:30+5:302014-08-12T00:11:30+5:30
नगर परिषद क्षेत्रातील ओला व सुका कचरा सवरगड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प डम्प केल्या जातो. या प्रकल्पामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पावसाळ््याच्या दिवसात

सावरगड कचरा व्यवस्थापन प्रकल्प हटविण्याची मागणी
यवतमाळ : नगर परिषद क्षेत्रातील ओला व सुका कचरा सवरगड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प डम्प केल्या जातो. या प्रकल्पामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पावसाळ््याच्या दिवसात याभागात राहणेही नकोशे होेते. तीन हजार लोकसंख्येच्या सावरगडचे आरोग्यच धोक्यात आले आहे. ही बाब वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला. त्यानंतर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरातून गोळा केलेला संपूर्ण कचरा सावरगड येथील घण कचरा व्यवस्थापन प्रकल्पावर टाकला जातो. सातत्याने कचऱ्याचे ढिगारे येथे जमा होतात. पावसाचे पाणी या कचऱ्यात मुरल्याने येथे डास, माश्या हे कीटक घोंघावतात. यापासून गावात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय हा प्रकल्प उंच भागावर असल्याने कचऱ्यातील घाण झिरपून आजुबाजुच्या जलस्त्रोतात मिसळण्याची भिती आहे. काही दिवसातच येथील पाणी पुरवठ्याच्या बोअरचे पाणी दूषीत होण्याची शक्यताही ग्रामस्थांनी वर्तविली आहे. हा कचरा डेपो तयार करतानाच ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला होता. मात्र त्यावेळी विविध पद्धतीचा दबाव आणून आंदोलन दडपण्यात आले.
त्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यावेळी तत्कालिन आमदारांनी १५ दिवसांच्या आत या प्रश्नाचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही कुठलाच तोडगा निघाला नाही. आता संपूर्ण ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने अखेरचा लढा
देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
या कचरा डेपोची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अथवा येथे रास्तारोको आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी सावरगडचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर नगरपरिषद काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)