गारपीटग्रस्तांच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी
By Admin | Updated: May 14, 2014 02:07 IST2014-05-14T00:00:08+5:302014-05-14T02:07:18+5:30
यंदाचा रबी हंगाम गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

गारपीटग्रस्तांच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी
यवतमाळ : यंदाचा रबी हंगाम गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वादळ व गारपिटीमुळे गहू, हरभरा, ओलिताची कपाशी, संत्रा, मोसंबी, लिंबू, पपई, आंबा या फळबागांचे नुकसान झाले. गारपिटग्रस्तांच्या सर्वेक्षणामध्ये मोठय़ा प्रमाणात चालढकल करण्यात आली असून गारपिटग्रस्तांचे पुनर्सर्वेक्षण करावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
गारपीटग्रस्तांची विवंचना लक्षात घेऊन शासनाने आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र नुकसानीचे सर्वेक्षण करताना निम्नस्तरीय शासकीय यंत्रणेने मोठय़ा प्रमाणात चालढकल केली. गारपीट झालेल्या क्षेत्रातील काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. तर काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षणच केले नाही. गारपिट झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ओलिताची कपाशी होती. परंतु कापूस या पिकाच्या नुकसानीची भरपाई द्यायची नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. गहू, हरभरा, फळबागांच्या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली. सर्वेक्षणापेक्षा जादा प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची पैसेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी असताना शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळालेल्या नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये गारपीट व वादळग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे, गारपीटग्रस्तांना वाढीव अर्थसहाय्य देण्यात यावे, ओलिताच्या कपाशीचा विचार व्हावा, दुष्काळीस्थितीत मिळणार्या सवलती देण्यात याव्या, शेतकऱ्यांकडील बँक कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे आदी मागण्या ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, विश्वास नांदेकर, नामदेव खोब्रागडे, माया राणे, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, श्रीधर मोहोड, पवन जयस्वाल, बाबू पाटील जैत, शैलेश ठाकूर, हरिहर लिंगनवार, विनोद जयसिंगपुरे, महेश नाईक, भाऊराव ढवळे, गजानन बेजंकिवार, गजानन भोकरे, अभय व्यास, अतुल गुल्हाने यांच्यासह शिवसैनिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
(शहर प्रतिनिधी)