फैसला २४ तासांत
By Admin | Updated: May 15, 2014 01:29 IST2014-05-15T01:29:01+5:302014-05-15T01:29:01+5:30
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची माळ भावना गवळी यांच्या गळ्यात कायम राहणार की,

फैसला २४ तासांत
काऊंट-डाऊन सुरू, उत्कंठा शिगेला पोहोचली भावनाताई की मोघे साहेब ?
यवतमाळ :
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची माळ भावना गवळी यांच्या गळ्यात कायम राहणार की, त्यांच्या गळ्यातून निघून ती शिवाजीराव मोघेंच्या गळ्यात पडणार याचा फैसला पुढील २४ तासात होणार आहे. त्याचे काऊंट-डाऊन सुरू झाले आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी १० एप्रिल रोजी मतदान घेतले गेले. त्यानंतर सुमारे महिनाभर निकालाची प्रतीक्षा होती. मतदानाच्या आठवडाभरानंतर कोण निवडून येणार ही चर्चा थांबली. परंतु गेल्या चार दिवसांपासून पुन्हा यवतमाळ-वाशिमचा खासदार कोण याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. १६ मे ही तारीख जसजसी जवळ येत आहे तसतशी ही चर्चा आणखी जोर पकडू लागली आहे.
युती व आघाडीकडून आपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ विजयाचा जोरदार युक्तीवाद केला जात असून तो पटवून देण्यासाठी आकडेमोडही केली जात आहे. दोनही कडे विजयाचा प्रचंड आत्मविश्वास आहे. काँग्रेसला पुसद व राळेगाव या मतदारसंघात मतांची नेमकी किती आघाडी मिळते याचा अंदाज लागेनासा झाला आहे. तरीही १५ ते २५ हजाराच्या आघाडीने मोघे साहेब निघतील, असा दावा त्यांचे निकटवर्तीय करीत आहेत. मुस्लीम, आदिवासी आणि त्यातही आंध समाजाची मिळालेली ९० ते १०० टक्के मते ही मोघेंसाठी जमेची बाजू ठरल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहे. ज्या प्रमाणे भावना गवळींसाठी कुणबी समाज एकत्र आला त्याच प्रमाणे मोघेंसाठी बंजारा समाजासह अन्य अल्पसंख्यक समाज एकत्र आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. शिवाय भावना गवळींबाबतची समाजासह पक्ष कार्यकर्ते व सहकारी पक्षांमध्ये असलेली नाराजी, मोघेंचा फ्रेश चेहरा या बाजूही काँग्रेससाठी जमेच्या ठरल्या. तिकडे भावना गवळी यांना आपल्या मतांची आघाडी गतवेळीएवढीच अर्थात ५० हजारांवर राहील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करताहेत. कुणबी समाजाची एकजूट, मोदींची लाट, बंजारा मतांचे विभाजन, काँग्रेसऐवजी बसपाकडे वळलेला दलित समाज, मर्यादित राहिलेला मनसेचा उमेदवार या भावना गवळींच्या विजयाच्या दाव्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या आहेत. मोघेंच्या निवडक समर्थकांमध्ये विजयाचा विश्वास दिसत असला तरी सरसकट काँग्रेसमध्ये मात्र तो पहायला मिळत नाही.
एक्झीट पोलचा मोदी लाटेचा कल पाहता काँग्रेसच्या गोटात स्मशान शांतता पहायला मिळत आहे. अनेक नेते मंडळी गावाबाहेर असून ते १६ मे रोजीच प्रकटणार आहेत. लोकसभेचे खरे राजकारण निकालानंतरच सुरू होणार आहे. पराभवाला कोण कारणीभूत ठरले याचा हिशेब विधानसभेत चुकता होईल. (जिल्हा प्रतिनिधी) सन २००९ लोकसभा निवडणुकीची स्थिती एकूण उमेदवार - २८ भावना गवळी (शिवसेना) - ३ लाख ८४ हजार ४४३ हरिभाऊ राठोड (काँग्रेस) - ३ लाख २७ हजार ४९२ अॅड. दिलीप एडतकर (बसपा) - ६३ हजार ७८१ शिवसेना - ५६ हजार ९५१ मतांनी विजयी शिवसेनेचा विजय झाल्यास लालदिव्याची संधी तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची गच्छंती 1शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्यास त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण शिवसेनेच्या त्या राज्यातील एकमेव महिला उमेदवार आहेत. खासदार म्हणून भावना गवळी यांनी २००९ मध्येच आपली खासदारकीची विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केली आहे. २०१४ ची ही निवडणूक त्यांची चौथी टर्म आहे. शिवसेनेचा विजय झाल्यास यवतमाळ जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रातील लाल दिवा मिळण्याची संधी चालून येणार आहे.
2काँग्रेसचे शिवाजीराव मोघे विजयी झाल्यास त्यांना विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ते विजयी झाल्यास महाराष्टÑाच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातून स्थानिक आमदारांना मात्र निश्चितच फायदा होईल. त्या दृष्टीने येथील माणिकराव ठाकरे, वामनराव कासावार यांना आतापासूनच मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यातील वर्णीचे वेध लागले आहेत. अशीच स्थिती चंद्रपुरात राहील. तेथे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे रिंगणात आहेत. 3शिवाजीराव मोघे आपल्या परंपरागत केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी मुलगा जितेंद्र मोघे याला प्रोजेक्ट करीत आहे. त्यासाठी त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले आहे. ते पाहता मोघेंना लोकसभेतील विजयाची खात्री असल्याचे स्पष्ट होते. मोघे निवडून यावे म्हणून वसंत पुरके यांनी आपल्या राळेगाव मतदारसंघात चांगलीच मेहनत घेतली. त्यामागेसुद्धा त्यांचा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचा स्वार्थ असल्याचे सांगितले जाते. 4महाराष्टÑातील निवडणुका या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. मात्र एक्झीट पोलचे अंदाज पाहता काँग्रेसचा सफाया होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. तसे झाल्यास माणिकरावांची प्रदेशाध्यक्ष पदावरील गच्छंती निश्चित मानली जात आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून माणिकराव स्वत: राजीनामा देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पराभव आणि प्रदेशाध्यक्ष पद जाण्याच्या भीतीनेच माणिकरावांनी लोकसभेच्या रिंगणात उतरणे टाळले. 5सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ५८.८० टक्के मतदान झाले. २००९ च्या तुलनेत पाच टक्के त्यात वाढ झाली. ही वाढ नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यात युवकांची मते निर्णायक आहेत.