खरीप पीक विम्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत
By Admin | Updated: July 24, 2015 02:09 IST2015-07-24T02:09:34+5:302015-07-24T02:09:34+5:30
खरीप पीक विम्याची अंतिम मुदत ३१ जुलै ही यावर्षी राहणार आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत रांगा लागल्या आहे.

खरीप पीक विम्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत
महागाव : खरीप पीक विम्याची अंतिम मुदत ३१ जुलै ही यावर्षी राहणार आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत रांगा लागल्या आहे. मागील वर्षीच्या पीक विम्याचे आठ कोटी ९६ लाख रुपये नुकतेच मोकळे झाल्यामुळे यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
खरिपाचा पीक विमा भरून घेतला जात असताना फळबाग शेतकऱ्यांना मात्र शासनाने फळबागांसाठी संरक्षण दिलेले नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. ७ जुलैपर्यंतच्या खरीप हंगाम पेरणी अहवालानुसार सोयाबीन १७ हजार ५८० हेक्टर, तीळ ५१ हेक्टर, तूर पाच हजार ९१५ हेक्टर, मूग ७१५ हेक्टर, उडीद ८१२ हेक्टर, साळ पाच हेक्टर, मका ११८ हेक्टर, ज्वारी तीन हजार ९९२ हेक्टर, बाजरी १२ हेक्टर, कापूस २९ हजार १७२ हेक्टर आणि ऊस १२ हेक्टर नोंदविला गेला आहे. यातील ऊस व इतर काही पिके वगळता पीक विम्याची भरावयाची रक्कम लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. लहान शेतकऱ्याला कापूस ११९७ तर मोठ्या शेतकऱ्याला दोन हजार ३९४, सोयाबीन ३२० व ६४१, तूर २५४ व ५०८, मूग १४१ व ३४३, उडीद १८५ व ३७८, ज्वारी १४४ ते २८८ अशा प्रमाणे वर्गवारी लहान व मोठ्या शेतकऱ्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार पीक विम्याची रक्कम भरून घेतली जात आहे. महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळबागांचे शेतकरी असून साडेतीन हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना विम्यामधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती ही केवळ खरिपाच्याच पिकावर ठरवून येते काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
फळबागा शेतकऱ्यांना विमा कवच नसल्याने फुटकी कवडीही मिळाली नाही. तालुक्यात मागील दहा वर्षांत १६२ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामध्ये फळबागा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
तालुक्यात ५२ हेक्टरवर आंबा, ६४ हेक्टरवर केळी, चार हेक्टर लिंबू, ९० हेक्टर संत्रा, ३२ हेक्टर मोसंबी, एक हेक्टर पेरू, २२ हेक्टर पपई, ३२ हेक्टर डाळिंब, दोन हेक्टर चिकू, १८ हेक्टरवर आवळा अशाप्रमाणे फळबागांची लागवड करण्यात आली आहे. वेणी, मुडाणा व महागाव येथील शेतकऱ्यांनी आवळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले होते. त्यामुळे आवळ्यापासून तयार होणाऱ्या इतर उत्पादक कंपन्यांनी महागाव येथे गर्दी केली होती. परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये आवळा सापडला आणि शेतकऱ्यांची हिम्मतच खचली. तिच गत द्राक्ष पिकांचीही झाली.
काऊरवाडी येथील डाळिंब व द्राक्ष उत्पादक शेतकरी आबासाहेब देशमुख खचून गेले होते. त्यांना शासनाकडून वेळीच मदत झाली असती तर आज ते प्रगत शेतकरी म्हणून नावारूपास आले असते व त्यांच्याकडून दुसऱ्यांनी प्रेरणा घेवून तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब व द्राक्ष उत्पादक शेतकरी तयार झाले असते. फळबागांवर येणारे रोग आणि त्यावर प्रतिबंधक उपाय सुचविण्यासाठी यंत्रणेचा हलगर्जीपणाही कारणीभूत असल्याचे वास्तव आहे. (शहर प्रतिनिधी)
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव
बागायतदार शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन कृषी विभागाकडून मिळत नसल्याचे सांगण्यात येते. खडका येथील प्रगतशील आणि उदयोन्मुख शेतकरी विजय पाटील खडकेकर हे अशाच संकटात सापडले आहे. त्यांच्या १८ एकरमधील डाळिंबावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. पाऊस नसल्याचेही एक कारण समोर येत आहे. अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कृषी तज्ज्ञांनी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना वेळीच मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.