दारव्हा शहर बनले कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:21+5:30
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नियोजन केले, त्यामुळे आता सर्व फोकस येथेचे राहील, हे नक्की झाले. तसेच स्थानिक यंत्रणासुद्धा मैदानात उतरली. उपाययोजना सुरु करण्यात आल्या. प्रथम बुलडाणा, मंगरुळपीर आणि कारंजा कनेक्शनमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काहींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

दारव्हा शहर बनले कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि वाढलेला मृत्यू दर बघता हॉट स्पॉट बनलेल्या दारव्हा शहराकडे जिल्हा प्रशासनाने सर्व लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या आजाराची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नियोजन केले, त्यामुळे आता सर्व फोकस येथेचे राहील, हे नक्की झाले. तसेच स्थानिक यंत्रणासुद्धा मैदानात उतरली. उपाययोजना सुरु करण्यात आल्या. प्रथम बुलडाणा, मंगरुळपीर आणि कारंजा कनेक्शनमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काहींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. नंतर मात्र मुंबईवरुन कुटुंबासह गावी परतलेला व्यक्ती, ईनामदारपुरा परिसरातील महिला व तिच्या संपर्कात आलेले १५, शिवाजीनगरमधील व्यक्ती, पोलीस कर्मचारी, खाटीकपुरातील व्यक्ती, ईनामदारपुरा, टीळकवाडी व खाटीकपुरा परीसरातील दोन महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे दारव्हा शहराची एकूण रुग्ण संख्या २१ वर पोहोचली आहे.
अचानक वाढलेले रुग्ण आणि मृत्यू दर बघता प्रशासन हादरून गेले. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तत्काळ उपाययोजना सुरू झाल्या. शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह येथे भेट देऊन संपूर्ण मोर्चा आपल्या हाती घेत नियोजन केले. नंतर उपाययोजनांना प्रचंड वेग आला. शहरात आता चार प्रतिबंधित क्षेत्र आहे. घरोघरी आरोग्य सर्वे सुरु करण्यात आला. या क्षेत्रात जंतुनाशकाची फवारणी, अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येईल. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक खुद्द १४ दिवस शहराला भेट देतील. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहे.
शहरासाठी एका तालुका आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहे. रस्त्यावरील अनावश्यक वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूला पाचारण करण्यात आले.
शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. याप्रमाणे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता
कोरोनाला शहरातून १५ दिवसांत हद्दपार करण्याचा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र त्यासाठी प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून शेकडोच्या संख्येने नागरिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील निघतील, असा अंदाज आहे. मात्र अनेकांची संस्थात्मक विलगीकरणात येण्याची मानसिकता नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी कशी तुटेल, असा प्रश्न आहे. उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार संजय जाधव, ठाणेदार मनोज केदारे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गजानन खरोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.सी. बानोत यांच्यासह नगरपरिषद, पोलीस महसूल, आरोग्य व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जिव धोक्यात घालून दिवस-रात्र परिश्रम घेत आहे. जिल्हा प्रशासनाने आपले लक्ष शहरावर केंद्रित केले. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन केले आहे.