विदर्भ-कोकणच्या कर्मचाऱ्यांचे धरणे
By Admin | Updated: April 5, 2016 04:59 IST2016-04-05T04:59:15+5:302016-04-05T04:59:15+5:30
संपूर्ण राज्यभरात विदर्भ कोकण ग्रामीण बँक आॅफिसर असोसिएशनच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयासमोर सोमवारी धरणे

विदर्भ-कोकणच्या कर्मचाऱ्यांचे धरणे
यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात विदर्भ कोकण ग्रामीण बँक आॅफिसर असोसिएशनच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयासमोर सोमवारी धरणे देण्यात आले. यावेळी व्यवस्थापनाने लादलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी धरणे देण्यात आले.
प्रशासकीय कार्यालयातून नाममात्र स्टेशनरी साहित्य दिले जाते. विविध आवश्यक बाबी महिनोन्महिने मिळत नाही. आजही अनेक शाखांत प्रिंटर्स बंद अवस्थेत आहेत. इतर ग्रामीण बँकांमध्ये कर्जवाटपात वाढ झाली आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या आजही अपुरी आहे. विदर्भातील कर्मचाऱ्यांचे बढती आदेश डावलण्यात आले आहे. बहुमतातील संघटनेच्या कर्मचाऱ्यांना डावलून एका विशिष्ट संघटनेच्या कर्मचाऱ्यांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. नियम डावलून कोकणातील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. विलीनीकरणाला अनेक वर्ष झाल्यानंतरही प्रॉव्हिडंट फंड मिळाला नाही. यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी मिळत नाही. सध्याच्या स्थितीत सर्व शाखा टीडीएसची रक्कम स्थानिक व्यावसायिक बँकांमध्ये जमा करत आहे. संघटनेने या संदर्भात व्यवस्थापनाला मुख्य कार्यालयात ही रक्कम केंद्रित करावी, अशा सूचना केल्या आहे. या नंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे देण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अध्यक्ष अशोक जाधव, सचिव शैलेश पाल, उपाध्यक्ष अभय बाभूळगावकर, सहसचिव संजीव मोहरील, विलास चेटुले, दीपक खडतकार, अशफाक सिद्दिकी, गोपाल विरुटकर, अविनाश पिसाळकर, कमलेश ठाकरे, जितेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)