विधवेच्या शेतीचे नुकसान
By Admin | Updated: June 25, 2015 02:34 IST2015-06-25T02:34:57+5:302015-06-25T02:34:57+5:30
तालुक्यातील टेंभी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला काढण्यात आल्याने शेतीचे दोन तुकडे पडले.

विधवेच्या शेतीचे नुकसान
शेतामधून काढला नाला : जलयुक्त शिवार अभियान उठले मुळावर
पांढरकवडा : तालुक्यातील टेंभी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला काढण्यात आल्याने शेतीचे दोन तुकडे पडले. परिणामी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
तालुक्यातील टेंभी येथील देविदास गांगुलवार या शेतकऱ्याने सन २०१० मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या शेतात कुटुंबिय कसेतरी उत्पन्न घेत होते. आता नुकतेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत त्यांच्या शेतात नालीचे खोलीकरण करण्यात आले. त्या नाल्याजवळ असलेल्या शेतातील ४२ सागवान वृक्षाची कत्तल त्यासाठी करण्यात आली. विशेष म्हणजे खोलीकरणासाठी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या संगनमताने त्यांच्या शेतातील हे तोडलेले सर्व सागवान आंधप्रदेशात विकल्याचा आरोप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाने केला आहे.
विशेष म्हणजे गांगुलवार यांचे शेत एकाबाजूने उतार भाग असून त्या ठिकाणी निसर्गत: नाला नव्हताच. मात्र त्यांच्या शेतात जबरीने खोदकाम करून त्या शेताचे दोन भाग केले व शेतात नाला निर्माण केला. त्यामुळे शेताचे मोठे नुकसान झाले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी आहे. या शेतातील सागवान वृक्ष विकून किंवा शेत विकून मुलीचे लग्न करण्याच्या बेतात मृतक देविदास गांगुलवार यांची विधवा पत्नी कमल गांगुलवार होती. मात्र जलयुक्त शिवार अभियानांतर्गत त्यांच्या शेताची दशाच बदलवून टाकण्यात आली आहे.
आता शेताचे दोन भाग झाल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जातासुद्धा येत नाही. शेतातील सागवन वृक्षही नष्ट करण्यात आले. त्यांनी २६ जूनच्या दरबारातही त्याची तक्रार केली. मात्र आता हा दरबार ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द झाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय शेतात लाखो रूपयांचे खोदकाम करण्यात आले. या कामामुळे कोणत्याही शेतकऱ्याला लाभ झाला नाही. उलट शेतकऱ्यांचे नुकसानच झाले असून त्यामुळे शेतकरी कुटुंब आता उध्वस्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)