दादा गटाच्या एन्ट्रीने माणिकरावांना धक्का
By Admin | Updated: September 24, 2014 23:41 IST2014-09-24T23:41:29+5:302014-09-24T23:41:29+5:30
गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या

दादा गटाच्या एन्ट्रीने माणिकरावांना धक्का
यवतमाळ : गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला आहे. विशेष असे दादा गटाची एन्ट्री मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झाल्याने भविष्यात या विरोधाच्या ठिणग्या पडण्याचीही शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, संचालक प्रफुल्ल मानकर यांच्या नेतृत्वात उत्तमराव पाटील समर्थकांनी बुधवारी लोणी येथे अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र दादा गटाचे अद्याप राष्ट्रवादीत असलेले अनेक समर्थक केव्हा प्रवेश घेणार याची चर्चाही बैठक स्थळी होती. दादा गट काँग्रेसमध्ये जाणार असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनीष पाटलांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आधी सोडा असे फर्मानही दिले होते, अशी माहिती आहे. मात्र मनीष पाटलांनी हे फर्मान जुमानले नाही. राष्ट्रवादीत जाण्याचा आमचा निर्णय चुकीचा होता, त्याबाबत पश्चाताप होत आहे, असे मनीष पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. दादा गटाच्या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
उत्तमराव पाटील यांचे बंधू जीवन पाटील यांनी यवतमाळ-वाशिमची लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. त्यावेळी तुमच्या मागे नेमके कोण आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर आता जीवन पाटलांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्र्यांमार्फत फिल्डींग लावली. जुनाच प्रश्न पुन्हा उपस्थित झाल्याने राष्ट्रवादीतील आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मात्र त्यासाठी उमेदवारीची अट घातली गेली. दादा गटाच्या नेत्यांनी अलिकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेश काँग्रेस हा वाद सर्वश्रृत आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळ जिल्ह्याचे असताना त्यांना बाजूला ठेऊन दादा गटाने थेट मुख्यमंत्र्यांशी संधान बांधल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा ठाकरे-पाटील गटाचा वाद कधी काळी थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता, याचे विस्मरण जिल्ह्यातील जनतेला अद्याप झाले नाही. हा वाद दादा गट राष्ट्रवादीत गेल्याने बाजूला पडला होता. मात्र आता त्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये एन्ट्री झाल्याने भविष्यात जुना राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दादा गटाच्या काँग्रेस प्रवेशापासून माणिकरावांनी स्वत:ला सुरुवातीपासूनच अलिप्त ठेवले. त्यावरून त्यांची नाराजी स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)