रूग्णालयाने टाकली कात
By Admin | Updated: October 8, 2014 23:34 IST2014-10-08T23:34:16+5:302014-10-08T23:34:16+5:30
आदिवासीबहुल या तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने केवळ आॅक्सिजनवर सुरू असणाऱ्या रूग्णालयाने कात टाकल्याने आता रूग्णालयास ऊर्जितावस्था आली आहे.

रूग्णालयाने टाकली कात
रिक्त पदे कायमच : केवळ ३० खाटांचे रूग्णालय, वास्तूच्या दुरुस्तीची गरज
मारेगाव : आदिवासीबहुल या तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने केवळ आॅक्सिजनवर सुरू असणाऱ्या रूग्णालयाने कात टाकल्याने आता रूग्णालयास ऊर्जितावस्था आली आहे. आता मोठ्या संख्येने, विश्वासाने रूग्ण येथे दाखल होऊ लागले आहे़
तालुक्यासाठी ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय शहरात आहे. मात्र रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने रूग्णालयच समस्याग्रस्त बनले होते़ रूग्ण कल्याण समितीचासुध्दा रूग्णालयावर अंकुश नव्हता़ रूग्णालयातील अर्ध्याअधिक खाटा बेपत्ता होत्या़ रूग्णालयात पिण्याचे पाणी नाही, नियमित स्वच्छता नाही़ विजेचे पंखे, कुलर नादुरूस्त होते. रूग्णालयात औषधी उपलब्ध असताना रूग्णांना बाहेरून औषधी आणावी लाग होती. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने अत्यावश्यक वेळी आरोग्य सेवा मिळत नव्हती़
अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या रूग्णालयात रूग्ण दाखल होण्यापेक्षा खासगी रूग्णालयाकडे धाव घेत होते़ रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. अशातच १ जुलै २०१४ रोजी या रूग्णालयात सेवाभावी वृत्तीचे डॉ़ सुभाष इंगळे रूजू झाले़ रूग्णालयाची खस्ता हालत बघून रूग्ण कल्याण समितीच्या सभेत त्यांनी रूग्णालयातील समस्यांचा विस्तृत पाढा आमदार कासावारांसमोर मांडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली़
उपलब्ध सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन रूग्णालयाला ऊर्जितावस्था आणून खऱ्या अर्थाने रूग्णांना रूग्णसेवा देण्याचा जणू त्यांनी संकल्प केला़ दवाखान्याची आंतरबाह्य रंगरंगोटी करून घेतली़ रूग्णालयातील दोनही वॉर्डात बेड लावले, भरपूर औषधी आणली. रूग्णालयातील बंद विद्युत पंखे फिरू लागले. रूग्णांसाठी फिल्टरचे पिण्याचे पाणी उपलब्ध करवून दिले़ दवाखान्याची नियमित स्वच्छता होऊ लागली़
सर्व कर्मचारी कामाला लागले़ एक महिन्यापूर्वी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ़संदीप वानखेडे येथे रूजू झाले़ तेही सेवाभावी वृत्तीचेच असल्याने आता दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर रूग्णसेवा सुरू केल्याने रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढली़ मागील महिन्यात तर एवढी रूग्णसंख्या वाढली की, रूग्णांना बेड कमी पडू लागले़
आता ग्रामीण रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलल्याने इतर खासगी रूग्णालयातील रूग्णसुध्दा येथे दाखल होऊ लागल्याने १० वर्षांपूर्वी याच रूग्णालयात सेवा देणारे डॉ़सिंग व डॉ़अरोरा यांची नागरिकांना आठवण होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या सेवा काळात दिलेली सेवा अविस्मरणीय ठरली होती. आता येथे कार्यरत डॉ़इंगळे आणि डॉ़ वानखेडेकडूनही नागरिकांची तीच अपेक्षा आहे़ (तालुका प्रतिनिधी)