मुद्रा बँक होणार प्रभावी
By Admin | Updated: June 16, 2016 02:50 IST2016-06-16T02:50:42+5:302016-06-16T02:50:42+5:30
मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या

मुद्रा बँक होणार प्रभावी
जिल्हास्तरावर समिती : प्रचार, प्रसार व समन्वयावर दिला जाईल भर
यवतमाळ : मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात येणार आहे.
८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधानांनी ‘मुद्रा बँक योजना’ कार्यान्वीत केली आहे. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारच्या तारण अथवा जामिनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. होतकरू, बुद्धीमान आणि जीवनात यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे लाखो तरुण आहेत. परंतु त्यांना कौटुंबिक पर्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान व्यवसाय, उद्योगही नव्याने उभारण्यामध्ये अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. कोणताही उद्योग, व्यापार किंंवा व्यवसाय उभारायचा असेल तर कमी व्याजदरात पतपुरवठा ही मुलभूत गरज असते. या सर्व बाबींचा विचार करून अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतुने पंतप्रधानांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्जपुरवठा करून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते.
मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये शिशू गट १० ते ५० हजारांपर्यंत, किशोर गट ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत आणि इतर गट यामध्ये पाच लाख ते दहा लाख पर्यंतचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत सबंधित बरोजगार व्यक्तीला जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादींमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे. यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक आदी छोट्या स्वरुपातील व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्जाची तरतूद आहे. ही मुद्रा बँक योजना ग्रामिण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे माहिती होण्यासाठी व योजनेचा लाभ गरजू, होतकरू व्यक्ती व बेरोजगार यांना व्हावा, या हेतुने राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर समिती नेमण्यात येऊन या समितीमार्फत या योजनेचा प्रचार, प्रसार आणि समन्वय करण्यात येणार आहे. मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी राहतील. तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव राहतील. उर्वरित कार्यकारिणीत सदस्य म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक, जिल्हा कौशल्य विकास (रोजगार व उद्योजकता) चे सहायक संचालक व चार अशासकीय व्यक्तींचा सदस्यांमध्ये समावेश राहील. (प्रतिनिधी)
प्रत्येक तीन महिन्यात अहवाल
मुद्रा बँक योजनेसंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या जिल्हा समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात येणार आहे. या समितीने मुद्रा बँक योजनेसंदर्भात केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी शासनास सादर करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत जिल्ह्यातील बँकांच्या प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेऊन या योजनेंतर्गत कर्जवाटपाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात येईल. गावागावांत होतकरू तरुणांची व व्यावसायिकांची कार्यशाळा, प्रशिक्षण, चर्चासत्रे आयोजित करण्यात येईल, त्यामध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सल्ला व यशस्वी उद्योजकांचे व्याख्यान होणार आहे.