नेत्यांच्या सभांमध्ये मजुरांचीच गर्दी
By Admin | Updated: October 7, 2014 23:40 IST2014-10-07T23:40:18+5:302014-10-07T23:40:18+5:30
निवडणुकांमधील प्रचार सभांमध्ये उसळणाऱ्या गर्दींवरून विजयाचे गणित मांडले जाते. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्याच्या सभेला गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न करतो. शहराच्या ठिकाणी होणाऱ्या सभांना

नेत्यांच्या सभांमध्ये मजुरांचीच गर्दी
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
निवडणुकांमधील प्रचार सभांमध्ये उसळणाऱ्या गर्दींवरून विजयाचे गणित मांडले जाते. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्याच्या सभेला गर्दी व्हावी यासाठी प्रयत्न करतो. शहराच्या ठिकाणी होणाऱ्या सभांना गर्दी होण्याची शक्यता कमी असल्याने आता गावखेड्यावरून मजुरांना आणले जाते. त्यासाठी त्यांना मजुरीही दिली जाते.
विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तस तसे राजकीय नेत्यांच्या सभाही होत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. या सभांंना होणारी गर्दी पाहून प्रत्येकच जण हबकत आहे. मात्र ही नेमकी गर्दी होते कशी, याचा शोध घेतला असता अर्ध्यापेक्षा अधिक श्रोते गाव खेड्यातून रोजाने आणलेले मजूर असल्याचे दिसून येते. या मजुरांचे दरही ठरले आहेत. महिलेला मजुरीसाठी १०० रुपये तर पुरुषाला २०० रुपये दिले जाते. या मजुरांना एकत्र करून सभेपर्यंत आणणाऱ्या मेटकराचे दर ५०० रुपये आहे. शहरालगतच्या गावातून मजुरांना वाहनाने सभास्थळी आणले जाते. या मजुरांची खास बडदास्तही ठेवली जाते. तरुणांसाठी गुटखा, खर्रा आदींची व्यवस्था केली जाते. सभेसाठी अनेकदा तर चुल बंद निमंत्रण दिले जाते. एकवेळच्या भोजनाचीही व्यवस्था या कार्यकर्त्यांची केली जाते. त्यामुळे गावागावात सध्या मजूरच दिसत नाही. आज इथली सभा संपली की उद्या तिथली सभा असाच त्यांचाच प्रवास सुरू आहे. कुठलेही काम नाही. सभेतील नेता काय बोलतो याचेही त्यांना घेणे-देणे नसते. काही मंडळी तर सभेत भाषण सुरू असताना आपल्याच गप्पांमध्ये व्यस्त असतात. सभेत बसायचे, वाटले तर टाळ्या वाजवायच्या आणि निघून यायचे. कोणत्याही पक्षाचे बंधन नाही की विचाराचे केवळ मजुरी मिळते ना हीच त्यांची भावना असते.
या सर्व प्रकारामुळे गावात मात्र मजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतातील कामे खोळंबली आहे. गत आठवड्यापासून तर कुणी कामावर यायलाही तयार नाही. त्यामुळे शेतकरी हतबल दिसत आहे. इकडे नेत्यांच्या सभा हाऊसफुल्ल होत असताना शेतात मात्र मजूर दिसत नाही. विक्रमी सभांचा आकडा सांगत विजयाचे गणित मांडायचे.