उमरखेड उपविभागाला कोट्यवधींचा फटका
By Admin | Updated: March 9, 2016 00:11 IST2016-03-09T00:11:44+5:302016-03-09T00:11:44+5:30
उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

उमरखेड उपविभागाला कोट्यवधींचा फटका
गारपिटीचा तडाखा : शेतकऱ्यांच्या व्यथा थेट दिल्लीत
उमरखेड : उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक गावात कृषी व महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा खासदार राजीव सातव यांनी थेट दिल्लीत मांडल्या आहे.
गत आठवड्यात महागाव आणि उमरखेड या तालुक्यात प्रचंड गारपीट झाली. अनेक गावात शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. त्यात उमरखेड तालुक्यातील साखरा, दिघडी, देवसरी, चालगणी, टाकळी, राजापूर, तिवडी, बाळदी, सुकळी तसेच महागाव तालुक्यातील लेवा, हिवरा, करंजखेड, महागाव, सवना, अंबोडा, गुंज, अनंतवाडी, धनोडा, ईजनी, पोहंडूळ, धार, आमणी या गावात प्रचंड नुकसान झाले. आता आठवडा झाला तरी बहुतांश गावात कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी पोहोचले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही प्रशासन दखल घ्यायला तयार नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. लेवाच्या सरपंच माहेश्वरी खंदारे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.शेतीच्या नुकसानीसोबतच उमरखेड उपविभागातील घरे, जनावरे, धान्य, टीनपत्रे आदींचेही मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांच्या या भावना हिंगोलीचे खासदार अॅड. राजीव सातव यांनी संसदेच्या अधिवेशनात शून्य प्रहरात उपस्थित केला. त्यांनी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. आता शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
(शहर प्रतिनिधी)